मुंबई : आपल्या देशात कोण काय करेल, याचा काही नेम नाहीच. पण क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी हनिमून रद्द केला हे सांगितले तर… आहो हे खरं आहे. त्याचं प्रमाण थोडं थोडकं नाही तर चक्क 42 टक्के आहे. एवढेच नव्हे तर फायनलासाठी नोकरी सोडणाऱ्या महाभागांचं प्रमाणही लक्षणीय असल्याचं आढळून आलंय.
डिजीटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म असणाऱ्या बुकिंग डॉट कॉम या संकेत स्थळाने केलेल्या अभ्यासानुसार 42 टक्के भारतीय क्रिकेटच्या महत्वाच्या अंतीम सामन्यासाठी अथवा त्यांच्या आवडत्या खेळाडूचा महत्वाच्या सामन्यासाठी आपल्या मधुचंद्रावर पाणी सोडतात. भारतीयांच्या प्रवासाच्या सवयीवर त्यांच्या खेळाच्या आवडीचा परिणाम किती होतो, याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याथून हा निष्कर्ष काढण्यात आला होता.
आपल्या संघाचा पुढील वर्षाचा अंतिम सामना पाहण्याचे नियोजन तब्बल 44 टक्के करतात. परदेशांत हेच प्रमाण 34 टक्क्याच्या घरात आहे. यात सर्वात जास्त आघाडीवर क्रिकेटप्रेमी आहेत. त्यापाठोपाठ क्रमांक लागतो तो फुटबॉलवरून जीव ओवाळून टाकणाऱ्यांचा.
त्यापेक्षा भारी म्हणजे 88 टक्के क्रिकेट चाहत्यांना पुढील चार वर्षात होणाऱ्या महत्वाच्या स्पर्धा पहायची इच्छा आहे. तर फुटबॉलप्रेमींमध्ये हेच प्रमाण 79 टक्के आहे. महत्वाच्या क्रिकेट आणि अन्य मैदानी खेळांच्या महत्वाच्या स्पर्धा 2020 मध्ये आशीयात होणार आहेत. तर युईएफओ युरो 2020चे औत्सुक्यही आहेच, असे बुकिंग डॉट कॉमचे दक्षिण आशियाई व्यवस्थापक रितू मलहोत्रा यांनी सांगितले.
या सर्वेक्षणात 41 टक्के भारतीय क्रिकेटप्रेमी ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी त्यांच्या नोकऱ्या गमावतात. हनिमुन रद्द करणाऱ्या क्रीडाप्रेमींचे जागतिक प्रमाण 19 टक्के आहे. खेळ पाहण्यासाठी प्रवास करणाऱ्यांमध्ये क्रिकेटप्रेमी 86 टक्के, फुटबॉलप्रेमी 51 टक्के, टेनीस 31 टक्के, हॉकी 23 टक्के तर मोटार स्पोर्टसचे 18 टक्के आहे. 22 हजार 603 क्रीडाप्रेमींचे सर्वेक्षण घेण्यात आले.