गोवाहटी – आसाममधील “उल्फा’ संघटनेने महिनाभरापूर्वी अपहरण केलेल्या “ओएनजीसी’च्या कर्मचाऱ्याची आज सुटका करण्यत आली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या आवाहनानंतर रितुल सैकिया या कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली.
सैकिया यांचे 21 एप्रिल रोजी “उल्फा’च्या बंडखोरांनी म्यानमारच्या सीमेजवळील नागालॅंडमधील मोन जिल्ह्यातल्या लोंगवा गावातून अपहरण केले होते, असे आसाम पोलिसांच्या मुख्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. बंडखोरांकडून सुटका झाल्यावर सैकिया काल संध्याकाळी घरी सुखरूप पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सैकिया यांच्या अपहरणानंतर 18 मे रोजी त्यांच्या घरी भेट दिली होती आणि सैकिया यांची सुटका करण्याचे आवाहन उल्फाला केले होते. राज्यपाल जगदीश मुखी यांनी सैकिया याच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
म्यानमारच्या सीमेमध्ये सैकिया यांची सुटका झाली. त्यानंतर ते पायी सीमा ओलांडून भारतीय हद्दील आले. त्यानंतर आसाम पोलीस, लष्कर आणि नागालॅंडच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि औपचारिकता पूर्ण करून घरी सोडले.
अलीकडेच उल्फाने तीन महिन्यांसाठी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आहे. मात्र, सरकारकडून या शस्त्रसंधीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला गेलेला नाही. “ओएनजीसी’च्या तीन कर्मचाऱ्यांचे 21 एप्रिल रोजी उल्फाच्या अतिरेक्यांनी आसाम-नागालॅंड सीमेवरील शिवसागर जिल्ह्यातील लक्कवा ऑईल फील्डमधून अपहरण केले होते. त्यापैकी दोघांची 24 एप्रिलला म्यनमारच्या सीमेजवळ झालेल्या चकमकीदरम्यान सुटका करण्यात आली, तर उर्वरित सैकिया यांचा शोध सुरूच होता.