विजय घोरपडे
नागठाणे – ग्वाल्हेर-बंगळुरू आशियाई महामार्ग क्र. 48, म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे उड्डाणपूल आहे. रस्ता आणि पुलाच्या जोडकामाच्या दुरुस्तीचे काम गेले अनेक महिने रखडले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक छोट्या वाहनधारकांसाठी जिवघेणी ठरत आहे.
या एकेरी वाहतुकीचा फटका अनेक वाहनधारकांना बसत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदाराचे डोळे कधी उघडणार, असा सवाल संतप्त वाहनधारक विचारत आहेत. तत्कालीन केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 चे चौपदरीकरण आणि कालांतराने पुणे-सातारा (वळसे) या टप्प्याचे सहापदरीकरण केले. या प्रकल्पाचा खर्च वाहनधारकांकडून वसूल करण्यासाठी टोलनाके उभारले. या सहापदरीकरणाच्या कामाचा दर्जा वेळोवेळी चर्चेचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे.
अगदी कमी कालावधीत केलेल्या दर्जाहीन कामामुळे अनेक ठिकाणी रस्ता खराब होण्याबरोबर, अनेक उड्डाणपूल खचणे, भेगा पडणे असे प्रकार वारंवार होत आहेत. वाहनधारकांकडून घेतलेल्या टोलच्या पैशातून रस्त्याची देखभाल, दुरुस्तीचे प्रयोजन असते; परंतु टोलवसुलीला प्राधान्य देणारी यंत्रणा रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष देत नसल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. सध्या शेंद्रे येथील उड्डाणपुलावरील रस्ता आणि या पुलाला जोडणाऱ्या भागाची दुरुस्ती सुरू आहे.
सातारा-कराड या तीनपदरी रस्ताच्या दोन लेन्सचे काम सुरू आहे. तेथे दोन महिन्यांपूर्वी जोडकामाच्या ठिकाणी खोदकाम करून, पुलाच्या सळया उघड्या ठेवल्या आहेत. या दोन्ही लेन्स काही अंतरापासून बंद करून, एकेरी वाहतूक सुरू आहे. तेथे जागोजागी रिफ्लेक्टर व सौर सिग्नल लावले आहेत; पण गेल्या दोन महिन्यांत येथे कोणतेही काम झालेले नाही. खिंडवाडीपासून उताराने वेगात येणाऱ्या वाहनांच्या चालकांना शेंद्रे येथे उड्डाण पुलावर अचानक डायव्हर्जन दिसत असल्याने, तेथे छोटेमोठे अपघात घडत आहेत.
यात वाहनांचे नुकसान आणि वाहतूक कोंडीही होत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. या अपघातांमुळे अनेक वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवत असून, “काम ना धाम अन् नुसतंच गाड्या धडकवून थांब’, असा प्रकार या पुलावर रोज पाहायला मिळत आहे. रोजच्या “धडामधुम’ अन् “खळ्ळ।खट्याक’च्या घटनांमुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता ठेकेदार व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका सोडून, दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि वित्त व संभाव्य जीवितहानी टाळावी, अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याची आमची मानसिकता आहे, असे वाहनधारक व प्रवासी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी दै. “प्रभात’च्या प्रतिनिधीकडे बोलून दाखवले.