पुणे, दि. 23 -नाटक करताना मला कधीच पारितोषिक मिळाले नाही, पण मी थांबलो नाही. पारितोषिक हे अंतिम सत्य नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तुम्हाला सर्वोत्तमाचे स्वप्न पडले पाहिजे. प्रयोगशील राहा. सूत्र सापडली नाहीत तरी जो कार्यरत राहतो, तो सृजनशील आत्मा असतो. स्वत:ला “डिस्मेंटल’करून बघणे हा धोका पत्करण्याचा संस्कार केवळ नाटककारच करू शकतो,’ असे मार्गदर्शन ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक वामन केंद्रे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. भरत नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला स्पर्धेच्या परीक्षक पौर्णिमा मनोहर, स्वाती महाळंक, आशुतोष नेर्लेकर, महाराष्ट्रीय कलोपासक’चे अध्यक्ष अनंत निघोजकर उपस्थित होते. “नाटक हे जीवनरसाने ओतप्रोत भरलेले माध्यम आहे. मराठी माणसाला नाटक आणि सर्व कलाप्रकारांचे वेड आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात लोकाश्रयावर दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ नाटकांची परंपरा टिकली. उत्तमोत्तम कलाप्रकारांची निर्मिती झाली. “घाशीराम कोतवाल’ आणि “झुलवा’ ही नाटके महाराष्ट्राच्या नव्हे, तर भारतीय रंगभूमीवरची मैलाचे दगड ठरली,’ असे सांगून केंद्रे म्हणाले, “कोणताही कलाकार, दिग्दर्शक नाटकाच्या माध्यमातून माणसांच्या मनाची सेवा करतो. त्याला संवेदनशील बनवतो. रंगदेवतेची सेवा करताना मेवा कमी मिळतो; पण समाधान अमूल्य आहे,’ असे मत केंद्रे यांनी व्यक्त केले. संस्थेचे चिटणीस ऍड. राजेंद्र ठाकुरदेसाई यांनी यापूर्वीच्या पुरुषोत्तम करंडक विजेत्या स्पर्धकांनी, रंगभूमीवरील मान्यवरांनी स्पर्धेविषयी विशेषांकामध्ये लिहिलेल्या लेखातील काही उतारे वाचून दाखवले.
उथळपणाचे वावडे असावे
सगळीकडे उथळपणाचा उदोउदो सुरू आहे. उथळपणा करणारे लाखो रुपये कमवत आहेत, तर कसदार माणसे मागे राहिली आहेत. जगभर ही लहर आली आहे. आपण शिकार होऊ नये याची भीती वाटणे गरजेचे आहे. कसदार, गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्याला उथळपणाचे वावडे असले पाहिजे,’ असे परखड मत केंद्रे यांनी व्यक्त केले.
“कलिगमन’ला रोख पारितोषिक
स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सांघिक कलाकृतीला देण्यात येणारा पुरुषोत्तम करंडक यंदा कोणत्याही संघाला मिळाला नाही. पीआयसीटी महाविद्यालयाच्या “कलिगमन’ या एकांकिलेला केवळ प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक देण्यात आले. बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या “भू-भू’ या एकांकिकेला द्वितीय आणि शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या “गाभारा’ एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.