प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपुल उभारण्यासाठी या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मात्र, चौकात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पडलेले खड्डे, रुंदीकरणाचे अर्धवट काम, सेवा वाहिन्या शिफ्ट करण्यासाठी लागणारा उशीर आणि त्यातच कोंडी फोडण्यासाठी नेमलेले निष्क्रीय वॉर्डन आणि पोलिस यांच्या भूमिकेमुळे या चौकातील वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी मनस्ताप ठरत आहे. या चौकातून पुढे जायचे असल्यास एक किलोमीटर अंतरासाठी जवळपास एक तास वेळ लागत आहे.
चौकात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डझनभर पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, थोडा जरी पाऊस आला तरी लगेच हे पोलीस चौकातून गायब होत असल्याचे बुधवारी दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहण्यात दिसून आले. पाऊस सुरू होताच सर्वच पोलीस बाजूला उभारलेल्या शेडमध्ये जात होते. सकाळी आणि संध्याकाळी कोणत्या दिशेने जास्त वाहतूक होते, याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार सिग्नलच्या वेळेत बदल आवश्यक असताना केवळ दीड मिनिटच सिग्नल दिला जात असल्याने चौकात येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत.
या चौकात बाणेर आणि औंधकडून आलेल्या वाहनचालकांना चौकातून पुढे येताच रस्त्यांवरील खड्डयांचा आणि खचलेल्या रस्त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी टाकण्यात आलेल्या पावसाळी जलवाहिन्यांच्या चेंबरच्या जाळ्याही समतल नसल्याने वाहनांना अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, राष्ट्रीय सूचना केंद्राच्या परिसरात अर्धवट रुंदीकरण झाले असल्याने वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक मेटाकुटीला येत आहेत. सकाळ-संध्याकाळ वाहनांची भलीमोठी रांग या परिसरात कायम पाहावयास मिळते.
अर्धवट कामांचा वाहतुकीला अडथळा
उड्डाणपुलाचे काम सुरू करायचे असल्याने या चौकातील 1200 मिमी व्यासाची जलवाहिनी शिफ्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी गणेशखिंड रस्त्याकडून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केले असून, या रस्त्यावर हे पाइप आठवड्याभरापूर्वी आणून टाकले आहेत. त्यामुळे हा रस्ता रुंद होऊनही त्याचा वापर करता येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी सकाळी आठनंतर या रस्त्यावर सुरू होणारा वाहतूक कोंडीचा खेळ रात्री 9 पर्यंत कायम राहत असल्याचे चित्र आहे. तसेच या ठिकाणी वाहतूक मंदावल्याने थेट म्हसोबा गेटपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे.
जागोजागी खड्ड्यांमुळे वाहनांच्या वेगाला ब्रेक
इ-स्क्वेअरकडून विद्यापीठ चौकात येणाऱ्या रस्त्यावर 500 मीटर अंतरात प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच ठिकाणी विद्यापीठाकडून सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी यू टर्न आहे. ही वाहने या रस्त्याने वळाल्यानंतर त्यांना या खड्ड्यातून पुढे जाताना या वाहनांचा वेग मंदावत आहे. परिणामी, या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, हे खड्डे कोणी दुरुस्त करायचे यावरून महापालिका आणि “पीएमआरडीए’मध्ये वाद सुरू असल्याने त्याचा मनस्ताप पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
या चौकात गणेशोत्सव संपताच उड्डाणपुलाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन वाढविणे, रस्त्याखालील सेवावाहिन्यांची तपासणी करणे, तसेच वाहतुकीत बदल करणे हे संयुक्त निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार रखडलेली कामे तातडीने पूर्ण केली जातील. तसेच या रस्त्यावर असलेले खड्डे दोन दिवसांच्या आत दुरुस्त केले जातील.
विक्रमकुमार, महापालिका आयुक्त