प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 – गेल्या महिन्यात पावसाने रस्त्यांची चाळण झाली होती. यातील अनेक रस्त्यांचे काही दिवसांपूर्वीच झाले होते. तर, काही रस्त्यांचे काम झाल्यानंतर त्यांचा तीन वर्षांचा दोष दायित्वाचा कालावधी शिल्लक असतानाही खड्डे पडले होते. त्यामुळे महापालिकेने या रस्त्यांच्या कामाची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करून घेतली होती. या तपासणीचा अहवाल महापालिकेस प्राप्त होऊन जवळपास 20 दिवस उलटून गेले, तरी या अहवालात दोषी असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्यास महापालिकेस अद्याप वेळच मिळत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शहरातील 139 पैकी केवळ 17 रस्तेच खराब झाल्याचा अहवाल त्रयस्थ संस्थेने दिला आहे. त्यातही 8 रस्त्यांना इतर विभागांनी केलेल्या खोदकामांमुळे खड्डे पडले आहेत. तर 9 रस्ते हे दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड- डीएलपी) असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाऊस थांबल्यानंतर पालिकेने जवळपास 15 हजार खड्डे दुरूस्त केले. मात्र, या खड्डयांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होताच आयुक्तांनी मुख्य पथ खात्याकडील 139 “डीएलपी’मधील रस्त्यांची पाहणी करून त्यांची सद्यःस्थिती कशी आहे याचा अहवाल सादर करण्यासाठी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या त्रयस्थ संस्थेला नियुक्त केले होते. या संस्थेने शहरातील 138 रस्त्यांची पाहणी करून 29 जुलै रोजी अहवाल सादर केला आहे. त्यात सर्वाधिक 17 रस्त्यांवर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. या 17 पैकी तीन ठेकेदारांवर यापूर्वीच कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. मात्र, त्यानंतर इतर ठेकेदारांवर कारवाईसाठी पालिकेस वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.