भारतात 11 वर्षात 697 वेळा नेट बंदी
नवी दिल्ली : आधुनिक काळामध्ये सर्व प्रकारच्या दळणवळणासाठी इंटरनेटचा वापर अनिवार्य आहे पण तांत्रिक कारणाने जर हे इंटरनेट बंद पडले तर त्याचा मोठा फटका बसतो एक तास जरी इंटरनेट सेवा बंद झाली तरी भारतात 442 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे आकडेवारी समोर आली आहे.
भारताचा विचार करता जगभरातील देशांमध्ये इंटरनेट बंदी मध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजेच इंटरनेट सेवा खंडित होण्याचे सर्वात जास्त प्रकार अजूनही भारतातच घडत आहेत. गेल्या अकरा वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल 697 वेळा इंटरनेटसेवा विविध कारणाने खंडित झाली आहे. यापैकी चाळीस वेळा इंटरनेट सेवा तब्बल तीन दिवस खंडित राहण्याचा विक्रमही घडला आहे. जगभरातील इंटरनेट सेवेवर लक्ष ठेवणाऱ्या एक्सेस न्यावा या संस्थेने आपला नवीन अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे तर 2022 मध्ये भारतीयांना 84 वेळा इंटरनेट शट डाऊन लचा सामना करावा लागला अहवालात म्हटले आहे.
2023 या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच सात वेळा इंटरनेट शटडाऊन झाले आहे आधुनिक भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वच प्रकारच्या व्यवहारांसाठी इंटरनेटचा वापर केला जात असल्याने सेवा खंडित झाल्यावर सर्वच व्यवहार ठप्प होत आहेत. काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढल्याने इंटरनेट सेवा खंडित झाल्यावर हे पेमेंटचे व्यवहारही रखडतात त्याचा मोठा फटका छोट्या व्यावसायिकानाही बसू लागला आहे.
पेमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन दिलीप आसबे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जानेवारी 2023 या एकाच महिन्यात भारतात डिजिटल पेमेंटचे तब्बल 800 कोटी व्यवहार झाले आणि 17 लाख कोटी रुपयांची देवाण घेवाण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंटचा वापर केला जात असल्याने जर इंटरनेट सेवा बंद झाली तरी त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसतो. भारतात राजकीय कारणामुळे जम्मू-काश्मीर सारख्या राज्यामध्ये नेट बंदी जाणीवपूर्वक केली जाते. या राज्यांमध्ये तब्बल 552 दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा विक्रमही करण्यात आला आहे.