राहू – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि., पाटेठाण (ता. दौंड) कारखान्यात रविवारी (दि. 1) एक तास श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच कारखाना वसाहतीमधील महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्मोहिमेमध्ये कारखान्यातील कर्मचारी बांधवांनी वापरायोग्य व अनावश्यक स्क्रॅप वर्गीकरण करण्यात आले. कारखाना परिसरातील गवत, कचरा, कागद, पी. पी. पिशव्या, मोठे दगड, झुडपे आदींची सफाई करण्यात आली, तसेच गोपालन परिसर, गार्डन व रोपवाटिका येथील गवतकचरा काढून स्वच्छता करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात जलसंधारण, वृक्षारोपण, पर्यावरण संगोपन, रस्ते दुरुस्ती, विविध आरोग्य शिबिरे अशी सामाजिक कार्यक्रम राबवले जातात.
या श्रमदान मोहिमेचे कारखान्यास स्वच्छतेबाबतचे प्रमाणपत्र शासनाच्या संकेतस्थळावरून देण्यात आले आहे, असेही रासकर यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सरव्यवस्थापक आर. एन. यादव, मुख्य अभियंता व्ही. व्ही. क्षीरसागर, एचआर मॅनेजर डी. व्ही. रणवरे, शेतकी अधिकारी ए. बी. शेंडगे, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व महिला उपस्थित होत्या.