मुंबई – देशात आता “एक देश, एक भाषा” हे धोरण राबवले गेले पाहिजे असा आग्रह धरत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता एक नवी लाईन धरली आहे. ते म्हणाले की संपूर्ण भारतात हिंदी बोलली जाते आणि त्याला स्वीकारार्हता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हे आव्हान स्वीकारले पाहिजे.
इंग्रजीचा पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार केला जावा, स्थानिक भाषांना नव्हे, असे शहा यांनी सांगितले होते त्याच्या एका महिन्यानंतर राऊत यांचे हे विधान आले आहे, या वक्तव्याला दक्षिणेतील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी जोरदार विरोध केला होता, दक्षिणेकडील नेत्यांनी लोकांवर हिंदी लादणे मान्य नसल्याचे म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर एक देश एक भाषा या तत्वाचे देशभर पालन करण्याचे आव्हान गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारावे असेही राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईत उत्तर भारतीय म्हणजेच हिंदी भाषिकांची संख्या मोठी आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही लाईन घेतल्याचे मानले जात आहे.