उदयपूर – केंद्र सकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्याबद्दल कॉंग्रेसने शनिवारी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सरकारचा हा निर्णय शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना निर्यातीतून मिळणाऱ्या चांगल्या भावाची संधी नाकारली गेली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या संबंधात प्रतिक्रीया देताना पी चिदंबरम यांनी म्हटले आहे की, माझ्या मते केंद्र सरकार पुरेसा गहू खरेदी करण्यात अपयशी ठरले आहे. गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे असे नव्हे. त्यांनी गव्हाची पुरेशी खरेदीच केलेली नाही त्यामुळे देशांतर्गत गव्हाची उपलब्धता करण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे.
त्यांनी गव्हाची पुरेशी खरेदी केली असती तर निर्यात बंदी करावी लागली नसती. आता शेतकऱ्यांना नुकसान सहन करायला लाऊन हे सरकार शेतकऱ्यांवर सूड उगवत आहे असा आरोपहीं त्यांनी केला आहे.
हे सरकार कधीच फारसे शेतकरी अनुकुल नव्हते. त्यामुळे त्यांनी अत्यंत बेदरकारपणे हा निर्णय लागू करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे असे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे.