रुग्ण आणि मृत्यूच्या आकड्यांबाबत उद्योगनगरीने मोठ-मोठ्या राज्यांनाही टाकले मागे
पिंपरी – संपूर्ण देशामध्ये करोनाने थैमान घातले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच मृतांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत देशामध्ये सुमारे 51 हजार रुग्णांचा बळी गेला आहे. त्यापैकी 1.54 टक्के मृत्यू हे एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील आहेत. देशात लहान-मोठी सुमारे चार हजार शहरे आहेत. परंतु पिंपरी-चिंचवड आता करोनाचा सर्वाधिक उद्रेक असणाऱ्या शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे.
शहरातील करोनाबाधितांच्या मृत्यूची आकडेवारी इतक्या वेगाने वाढत आहे की हे शहर आता देशातील राज्यांसोबत स्पर्धा करु लागले आहे. देशातील एकूण 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी केवळ नऊ राज्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. तसेच एकूण करोनाबाधितांच्या संख्येतही पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा केवळ दहा राज्ये पुढे आहेत.
आतापर्यंत शहरात 789 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण मृत्यूपैकी 5.77 टक्के मृत्यू शहरामध्ये झाले आहेत. तर देशातील एकूण करोना मृत्यूपैकी 1.54 टक्के मृत्यू हे एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये झाले आहेत. शहरात रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरात 36078 एवढ्या रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. दरदिवशी सरासरी 900 ते 1000 रुग्ण सापडत आहेत.
शहरात पहिला करोनाचा रुग्ण 11 मार्च रोजी आढळला होता. 11 मार्च पासून ते 1 जुलैपर्यंत एकूण 77 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर 2 जुलैपासून 31 जुलैपर्यंत 363 रुग्णांचा मृत्यू झाला. 31 जुलै सायंकाळपर्यंत शहरातील 335 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 86 अशा एकूण 421 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. एक ऑगस्टपासून दैनंदिन रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. जुलैच्या अखेरीस रोज एक हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते. ते ऑगस्टमध्ये काहीसे कमी झाले. परंतु याच काळात मृत्यूंचा आकडा मात्र वाढत होता. 6 ऑगस्टपर्यंत 545 जणांचा मृत्यू झाला होता.
राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, केरळ अशा मोठ्या राज्यांची एकूण रुग्णसंख्या पिंपरी-चिंचवडपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत शहराने 24 राज्यांना तर मृत्यूच्या प्रमाणामध्ये 29 राज्यांना मागे टाकले आहे. देशामध्ये 4 हजार शहरे आहेत. त्यापैकी करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये शहराचे प्रमाण 1.54 टक्के असणे धोकादायक आहे. यावरून करोनाची दाहकता लक्षात येते. विशेष म्हणजे शहरातील 22 ते 40 वय असलेल्या रुग्णांचाही मृत्यू झाला आहे.
अकरा दिवसांत तब्बल 244 मृत्यू
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 6 ते 17 ऑगस्ट या 11 दिवसांमध्ये करोनाने थैमान घातले आहे. या दिवसांत तब्बल 244 रुग्णांचा बळी गेला आहे. शहरात 6 ऑगस्टपर्यंत एकूण करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 545 इतका होता. तर पुढील अकरा दिवसांतच दररोज सरासरी 22 मृत्यू याप्रमाणे तब्बल 244 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.