मुंबई – राज्यात वाढत्या करोना संसर्गामुळे 30 एप्रिलपर्यंत विकेंड लाॅकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि इतर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यातच राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शुक्रवारपासून शहरातील सर्व व्यापारी दुकाने उघडतील, असा इशारा फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले,”कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. केंद्र सरकारही या संबंधी आग्रही आहे.
कालच मी देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या काही कमतरता असतील त्यासंबंधी चर्चा केली. केंद्र सरकारचा आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनिशी राज्यांच्या पाठीशी आहे. त्यांची मदत आणि आपल्या सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे.
शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी प्रत्येक घटकाला या संकटामुळे झळ बसली आहे. दुकानं व व्यापार-धंदे बंद असल्यामुळे नुकसान होत आहे. फळे-भाजीपाला या नाशिवंत मालाच्या विक्रीचा प्रश्न उभा राहिल्याने शेतकरी वर्गाचंही अपरिमित नुकसान झालं आहे.
शरद पवार यांचे फेसबुक लाईव्ह
या परिस्थितीला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. समाजातल्या सर्व घटकांना विनंती की आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीविताच्या दृष्टीने काही अपरिहार्य निर्णय राज्य सरकारला घ्यावेच लागतात. हे निर्णय राबवण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे.
सगळ्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना माझी आग्रहाची विनंती आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नात आपले सहकार्य असू द्या.
महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, सर्व घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून हिमतीने सामोरं जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. या सामुदायिक प्रयत्नांतून आपण कोरोनावर निश्चित मात करू आणि या संकटातून नागरिकांची सुटका करू.”