पुणे – राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांकडे दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध असून, केंद्र सरकारकडे महाराष्ट्रासाठी 50 लाख लसींची मागणी केली आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.
राज्यात लसीकरणाला वेग आला असून, लसींचा साठा अपुरा पडत आहे. आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन मिळून 1 कोटी 6 लाख लसींचे डोस मिळाले आहेत. सध्या राज्यात 4 हजार 893 लसीकरण केंद्र असून, तेथे दररोज सुमारे 3 ते चार लाख लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत राज्यात 90 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात दररोज 4 लाख जणांचे लसीकरण करण्यात येत आहे. राज्याची लसीकरण सिस्टिम ही खूप चांगली आहे. राज्यात 45 आणि त्यापुढील वयाचे लाभार्थी 3 कोटी 86 लाख आहे. त्या सर्वाचे लसीकरण करण्यासाठी वेस्टेज धरून सुमरे चार ते सव्वाचार कोटी डोसची आवश्यकता आहे. सध्या राज्याने 50 लाख डोसची मागणी केली आहे. मात्र, हे डोस कधी उपलब्ध होतील याविषयी काही सांगू शकत नाही.
– डॉ. दिलीप पाटील, राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख तथा आरोग्य उपसंचालक