मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार (AjitPawar) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकारणात चांगलीच चर्चा आहे. अजित पवार यांना डेंग्यू झाल्यानंतर देखील त्यांनी अमित शहांची भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी या भेटीबाबत मोठा दावा केला आहे.
ही पूर्वनियोजित भेट असल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं मात्र अजित पवारांची गळचेपी होत आहे असं मत विनायक राऊत यांनी व्यक्त केलं. माध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांनी पवार शहा भेटीबाबत भाष्य केलं.
“मागच्या आठवड्यात दिल्लीला जाऊन अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदेंचं विसर्जन झाल्यावर म्हणजेच कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली असल्याचे समजते” असं विनायक राऊत यावेळी म्हणाले.
विनायक राऊत पुढे म्हणाले,अजित पवारांना पश्चताप होतोय, त्या पश्चातापातून कसं मुक्त व्हायचं याकरता ते विचार करत आहेत. अजित दादा स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देण्याचं काम ठाकरेंनी केलं होतं. परंतु, आता त्यांची गळचेपी होत असल्याचं प्रत्येक विधानातून दिसून येतंय” असं राऊत म्हणाले.