मुंबई – विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात चांगलीच वादळी झाली. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. अवकाळी वृष्टीमुळे सध्या शेतकऱ्याचे बरेच नुकसान झालेलं आहे. अशात सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहण्याची गरज असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. कांद्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.
कांदा उत्पादकांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्याला मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर बाब असल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
नाफेडकडून अजूनही कांदा खरेदी सुरू नाही, म्हणत अजित पवार सभागृहात आक्रमक झाले होते. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देताना काही ठिकाणी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाल्याचा दावा करण्यात आला. कांद्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
कृषिमंत्र्याच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या करत असल्याचं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर शेतकरी संकटात असताना सरकार त्यांना मदत करण्याचं आश्वासनही देत नसल्याचं देखील पवार यावेळी म्हणाले.