मुंबई – सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पेटाऱ्यातून राज्याला काय देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. उद्योगात 6.1 टक्के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तसेच, या वर्षामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. काल -परवा झालेल्या पावसामुळे रब्बी पीकाचं मोठं नुकसान झालं. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं बळीराजा हवालदील झाला आहे.
त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे फडवीस हवालदील झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजल्यानंतर फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.