नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी ज्या मागण्या पुढे करीत आंदोलन पुकारले आहे त्या मागण्यांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी आम्हाला वेळ लागेल असे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागण्यांवर विविध घटकांशी चर्चा करावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, आम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. या मुद्द्यावर कोणी राजकारण करत असेल तर त्याची आम्हाला चिंता नाही. आम्ही नेहमीच चर्चेसाठी तयार आहोत.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करण्यास तयार आहोत. हा मुद्दा राज्य सरकारांसाठीही चिंतेचा विषय आहे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे, असे त्यांनी सांगितले. आम्हाला या विषयावर राज्य सरकारांशी सल्लामसलत करावी लागेल असे त्यांनी नमूद केले.
भारत सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यास बांधील आहे आणि आंदोलनांतून जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याचीही काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे ही बाब शेतकरी संघटनांनी समजून घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. मी दोनदा चंदीगडला जाऊन शेतकरी संघटनांशी बोललो आहे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक चर्चा केली. ती योग्य मार्गावर होती अशी माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आणि इतर पक्षांवर अर्जुन मुंडा म्हणाले, मी या विषयावर काहीही बोलणार नाही कारण आम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची जास्त काळजी आहे. कोणी राजकारण करत आहे का,आणखी काय करत आहे याच्या तपशीलात मी जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.