मुंबई – विधवा महिलांच्या सन्मानासाठी महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहे. यापुढे विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र या प्रस्तावावर महिला संघटनांनी आक्षेप घेतला आहे. कारण ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख केल्याने समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होऊ शकते. त्यामुळे महिला संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. याशिवाय सोशल मीडियाद्वारे देखील या प्रस्तावाला तीव्र विरोध केला जात आहे.
अशात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या निर्णयावरून लोढा यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या,’विधवा महिलांना समाजात जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल, यासाठी लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची घालावी. बाकी आम्ही सगळ्याच महिला, आमच्या ज्या अशा महिला किंवा भगिनी आहेत, माता आहेत त्यांनी काय नावं लावायची ते बघून घेऊ. त्यासंदर्भातल लोढांनी फार लोड घेऊ नये. महिलांबाबत वारंवार भाजपा नेत्यांकडून चुकीचं विधानं केली जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलणार आहेत का? हे सगळं गांभीर्याने घेणार आहेत का ?’ असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
प्रस्तावात काय लिहिले आहे?
समाजातील उपेक्षित घटकांस विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय व त्यांची प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी ‘दिव्यांग’ ही संकल्पना जाहीर केलेली असून यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन यातही आमूलाग्र बदल झालेले आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी.