नवी दिल्ली – भारताची स्टार धावपटू धूती चंद हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी सज्ज असून टोकियोत सुवर्णपदकाचा वेध घेणार असा निर्धार व्यक्त केला आहे. धूतीने इटलीत गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत विक्रम साकार केला होता.
100 मीटर तसेच 200 मीटर अंतराच्या शर्यतीत सहभागी होत तिने राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली आहे. करोनामुळे क्रीडा स्पर्धा तसेच सरावदेखील ठप्प झाला होता. त्यानंतर आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये यात सवलती देण्यात आल्याने क्रीडा संकुले व मैदाने खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे जवळपास दोन महिन्यांनंतर धूतीने सिंथेटिक ट्रॅकवर पाऊल ठेवले आहे.
येथील कलिंगा मैदानावरील ट्रॅकवर धूतीने सराव सुरू केला आहे. करोनाच्या धोक्याने जेव्हा देशात पहिले लॉकडाऊन झाले त्यावेळी खूप निराश झाले होते. आजवर कधीही अशा परिस्थितीचा कोणीच सामना केलेला नव्हता त्यामुळे एक खेळाडू म्हणून मला मानसिकरीत्या सक्षम होण्यासाठी खूप वेळ लागला. मात्र, आता ट्रॅकवर परतल्याने खूप आनंद होत आहे. आता आकाश खुले झाल्यासारखे वाटत आहे. आता संपूर्ण लक्ष सरावावर देणार असून येत्या काळात स्पर्धा सुरू झाल्यावर खरेतर ऑलिम्पिकच्या तयारीला वेग येईल, असे मत धूतीने व्यक्त केले.
एन. रमेश हे माझे प्रशिक्षक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांमध्ये गेल्या मोसमात मला सातत्याने यश मिळवता आले. आता सराव सुरू झाला असून रमेशसर देखील माझ्या संपर्कात आहेत. कलिंगा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधा आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची जिम आहे. ज्या गोष्टी गेले दोन महिने मला वापरता आल्या नाहीत त्या आता खूप उपयोगी ठरणार आहेत. केवळ सरावावरच नव्हे तर तंदुरुस्तीवरसुद्धा भर द्यावा लागणार आहे, असे धूती म्हणाली.
पतियाळातील ग्रॅण्डप्रिंक्स स्पर्धा करोनामुळे रद्द झाल्यानंतर या स्पर्धेद्वारे पात्रता मिळविण्याची संधी वाया गेली. त्यावेळी खूप निराशा आली होती. आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत रजतपदक मिळाले तेव्हाच ग्रॅण्डप्रिंक्स स्पर्धेसाठी तयारी सुरू केली होती. मात्र, जे आपल्या हातात नाही त्यासाठी निराश होण्यापेक्षा आगामी काळातील स्पर्धांसाठी मानसिक सकारात्मकता राखणे जास्त महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. आता सुरू झालेल्या सराव सत्रात दररोज सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत अत्यंत काटेकोर पद्धतीने सराव करत आहे. प्रशिक्षक देखील व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत त्याचाही खूप उपयोग होत आहे, असेही धूतीने सांगितले.
ऑलिम्पिक पात्रता मिळवणे हेच सर्वांत मोठे लक्ष्य आहे. करोनामुळे ऑलिम्पिक जरी एक वर्षाने पुढे गेले असले तरीही येत्या काळात विविध पात्रता स्पर्धा होणार आहेत. त्यात सरस कामगिरी करत पात्रता मिळेल, असा मला विश्वास आहे. त्यानंतर मात्र, टोकियोत सुवर्णपदक जिंकूनच मायदेशी येणार, असा निर्धारही धूतीने व्यक्त केला.
7 सेकंदांनी पात्रता हुकली होती…
करोनाचा कहर सुरू होण्यापूर्वी एक राष्ट्रीय स्पर्धा झाली होती. त्यात धूतीने 100 मीटर अंतराच्या शर्यतीत 11ः22 सेकंद अशी वेळ दिली होती. ऑलिम्पिक पात्रतेचा निकष 11ः15 सेकंद होता. त्यावेळी केवळ 7 सेकंदांनी तिची पात्रतेची संधी हुकली होती. ही संधी वाया गेल्याचे दुःख आहेच. मात्र, त्यामुळे आता निराश न होता आगामी स्पर्धांमधून पात्रता मिळविणार, असा विश्वासही धूतीने व्यक्त केला.