मनपा आयुक्तांचा दावा
पुणे – केंद्रशासनाच्या सूचनांनुसार करोनाबाधित मात्र कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना दहा दिवसांनंतर कोणतीही तपासणी न करता घरी सोडण्यात येत आहे. विलगीकरणाचे 14 दिवस पूर्ण झालेला एकालाही करोनाची पुन्हा बाधा झाली नसल्याचे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
यशस्वी उपचारानंतर पुन्हा करोना होण्याची प्रकरणे चीन तसेच इतर देशांमध्ये समोर आली आहेत. पण, पुण्यात आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या 2,200 रुग्णांमध्ये एकही प्रकरण समोर न आल्याने बाब ही दिलासादायक ठरली आहे. केंद्रशासनाने काही दिवसांपूर्वी करोना बाधित पण लक्षणे नसलेल्या रुग्णांना पुढील दहा दिवस कोणतीही लक्षणे नाहीत अशांना करोनाची तपासणी न करता घरी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पालिकेनेही या प्रक्रियेची सुरुवात केली.
मात्र, त्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला. अशा व्यक्ती घरी गेल्यास आणि त्यांना त्रास सुरू झाल्यास त्यांच्यामुळे इतरांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही करण्यात आलेली आहे.