नितीन साळुंखे
नागठाणे -देशभरात, महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. हा रोग पसरण्याला चीन जबाबदार असल्याची चर्चा असल्याने भारतीयांसह जगभरातून चीनबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे चिनी उत्पादने खरेदी न करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहेच. आता प्रत्येकाचे मनोरजंन करणारे “टिक-टॉक’ हे चिनी ऍपही आपल्या मोबाईलमधून अनइन्स्टॉल करण्यास सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियातून करण्यात येणारा प्रचार यासाठी परिणामकारक ठरत आहे. करोनाचा परिणाम सातारासारख्या शहरात व ग्रामीण भागातही झाला आहे. रुग्ण तर आढळलेच, पण अनेकांचे रोजगार, रोजीरोटी गेल्याने उपासमार सुरू झाली. चीनच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र नाराजी असल्याने रोजच सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडूनही चीनला शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. या करोना परिस्थितीमुळे प्रत्येक व्यक्तीवर विविध प्रकारे गंभीर परिणाम झाला आहे.
“टिक- टॉक’ची भुरळ तरुणाईसह प्रत्येकाला आहे. आपली कला या माध्यमातून सादर करण्याची संधी अनेक नवकलावंतांना मिळाली. दिवसभरातील कामाचा ताणतणाव घालविण्यासाठी व मनोरंजन करून घेण्यासाठी अनेकजण टिक-टॉकचा वापर करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशी उत्पादन व देशी व्यवसायावर भर देण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे हीच पद्धत देशाला तारणारी ठरेल अशी भूमिका जाहीर केली. यानंतर लगेचच गेल्या काही दिवसांपासून चिनी उत्पादने व सेवांविरुद्ध असंतोष पसरून या सेवा नाकारण्यात येत आहेत.