संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धोकासूचक इशारा
न्यूयॉर्क : जगातील सर्वच देशांमधील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून 2050 पर्यंत तब्बल पाच अब्ज म्हणजेच पाचशे कोटी लोकसंख्येला पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागेल असे, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ताज्या अहवालात म्हणण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा स्टेट ऑफ क्लायमेट सर्विसेस वॉटर या नावाचा हा महत्त्वाचा अहवाल नुकताच जारी करण्यात आला असून त्यामध्ये पाण्याबाबत हे धोकासूचक इशारे देण्यात आले आहेत. सध्या जगातील दोनशे कोटी लोकसंख्येला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
आणखीन सुमारे तीस वर्षांमध्ये म्हणजे 2050 पर्यंत पाचशे कोटी लोकसंख्येला ही पाणीटंचाई सतावेल असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालातील आकडेवारी प्रमाणे 2018 मध्ये जगातील साडेतीनशे कोटी लोकसंख्येला वर्षातील फक्त अकरा महिने पाणी मिळाले होते. म्हणजेच एक महिना त्यांना पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागले होते.
पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे. अर्थात केवळ पाणीटंचाईची समस्या नव्हे तर पावसाचे बदललेले वेळापत्रकही आगामी कालावधीमध्ये त्रासदायक ठरणार आहे. आशियाई देशांमध्ये भारतासह अनेक ठिकाणी गेल्या काही कालावधीमध्ये महापुराच्या ज्या घटना घडल्या त्या सूचक असून आगामी कालावधीमध्ये सुद्धा अशाच घटना घडतील असेही या अहवालात म्हटले आहे.
एकीकडे महापुरासारख्या घटना घडत असतानाच दुसरीकडे अनेकांना पाणीटंचाईचा सामनाही करावा लागणार आहे. सयुंक्त राष्ट्राच्या या अहवालाप्रमाणे पाणीटंचाईचा मोठा फटका आशियाई देशांना बसणार असल्याने या देशांनी आत्तापासूनच याबाबतचे नियोजन करावे असेही या अहवालात सुचवण्यात आले आहे.