“नंदिनी’ डॉ. कमलेश सोमण यांची कादंबरी वाचताना एका वैश्विक विचारांची जाणीव होते, याचबरोबर या कादंबरीतून जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. नंदिनी आणि अविनाश या दोन पात्रांभोवती फिरणारी आणि त्याचवेळी त्यांच्या भावविश्वाचे तरंग स्पष्ट करणारी ही कादंबरी विशिष्ट वयानंतर येणारी दुःखं, एकटेपण आणि त्यातून निर्माण होणारी वेदना यांच्या भिंती पार करून एका वेगळ्या जाणिवेकडे जाणारी आहे. किंबहुना या जाणिवांमधून नेणिवेकडे नेणारी आणि आंतरिक भावनांना साद घालणारी, असे या कादंबरीचे विश्लेषण करता येते.
या कादंबरीतील प्रमुख पात्र नंदिनी- मानसशास्त्राची अभ्यासक आहे. कॅन्सरने तिचा नवरा- अविनाश जातो आणि तिचे एकटेपण तिच्या अवतीभोवती फिरू लागते. मात्र, जाताना तो तिला “मुक्त व निर्भय मनाच्या व्यक्ती, तसेच नवी संस्कृती, मानून निर्माण करण्याच्या’ तिच्या स्वप्नाची आठवण करून देतो. त्याच्या आठवणीत जगण्यापेक्षा तिला नव्या दिशा शोधण्याचा मार्ग दाखवतो आणि नंदिनीचा प्रवास सुरू होतो, एकटेपणाकडून अंतिम सत्याकडे..!
या प्रवासात नंदिनीला एक नवे आकाश सापडते. अविनाशने सांगितल्याप्रमाणे ती डायरी लिहिण्यास सुरुवात करते. तिच्या या डायरीरूपी भावविश्वात आत्मशोधाचे अनेक पैलू दिसून येतात. टॉलस्टॉयची “इलियस’ ही कथा जीवनाचे मोठे सत्य तळहातावर ठेवते. दुःख, वेदना आणि वैफल्याचा स्पर्श न होताही जीवन जगण्याची कला शिकवते. “माऊली’ वृद्धाश्रमातील व्याख्यानानंतर जोगळेकर दाम्पत्य तिला भेटतात आणि तिला दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतात. स्वतःची जाणीव मुक्त केल्यावर जन्म-मृत्यूच्या पलीकडे जाता येते, ही जाणीव देतात.
“वृद्ध, वृद्धाश्रम आणि दुर्लक्षित मृत्यू’ या विषयावरील या कादंबरीतील प्रकरण खरोखरीच आत्मभान आणणारे आहे. येथे कला आणि जीवनाच्या कात्रीत सापडलेला क्षितिज समतोलत्वाचे अमृत नंदिनीला देऊन जातो.
“वार्धक्याचं आगमन हे एक प्रकारचे स्थित्यंतर असते’ खरे तर कादंबरीचे सार या वाक्यातच अनुभवायला मिळते. एकटेपणाला स्वीकारून नव्याने सुरुवात केली तर ती अधिक योग्य ठरते. महेश एलकुंचवार यांच्या “वाडा चिरेबंदी’ला या कादंबरीत एक सुंदर शब्द वापरला आहे, “मातृकोश’. वाडा आणि फ्लॅट संस्कृतीवर आधारलेले हे नाटक एकटेपणा आणि एकाकीपणा यातील अर्थ खऱ्या अर्थाने समजून सांगते.
कादंबरी “भूतकाळाचं विसर्जन’ या टप्प्यावर येते तेव्हाच मानवी मनाचा ठाव खऱ्या अर्थाने घेऊन जाते. मानवी मनाचे कंगोरे अनेक वेळा तात्विक, अध्यात्मिक पातळीवर स्पष्ट करते. याच टप्प्यावर नंदिनीला निर्मल भेटतो… आणि आयुष्याच्या या नव्या वळणावरील नंदिनीचा प्रवास मुळातूनच वाचकाला खिळवून ठेवतो. “वर्ड इज नॉट अ थिंग!’ कादंबरीतील हे वाक्य खऱ्या अर्थाने कादंबरीच्या शेवटच्या शब्दांत कळते. एकूणच डॉ. सोमण यांची ही कादंबरी “आनंदाश्रम-वानप्रस्थाश्रम आणि पुन्हा आनंदाश्रम’ अशा प्रवासातून नंदिनीला स्व-विषयक जागरूकतेकडे नेताना दिसते.