पुणे – आजकाल घरोघरी मुले टीव्ही, मोबाइलमध्ये गुरफटलेली दिसतात. काही मुले तर मोबाइलशिवाय जेवणही करत नाहीत. ही परिस्थिती बदलून या मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, त्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे संस्कार बालवयातच त्यांच्या अंगी रुजावेत या हेतूने नांदेड सिटी येथील मंगल भैरव गृहरचना संस्थेने पुस्तक महोत्सव २०२४ चे आयोजन केले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला.
या महोत्सवाची सुरुवात दिमाखदार ग्रंथदिंडीने करण्यात आली. या दोन दिवसांच्या महोत्सवात लोकसहभागातून उभारलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन, भव्य ग्रंथप्रदर्शन, तसेच मुलांसाठी नाट्यछटा सादरीकरण, वक्तृत्व स्पर्धा, बालकवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नामवंत लेखिका वंदना बोकिल, बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे, लेखिका प्रियंका चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते आविनाशदादा लगड आणि विजयबापू लगड हे उपस्थित होते.
यावेळी बोकिल यांनी विविध गोष्टींमधून मुलांना पुस्तक वाचनाचे महत्व पटवून दिले. तसेच अविनाश निमसे यांनी ग्रंथालयाला त्यांच्या बुकक्लब संस्थेतर्फे देणगी स्वरूपात पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. प्रियंका चौधरी यांनी स्वातंत्र्य चळवळ तसेच साहित्य क्षेत्रात महिलांचा सहभाग याविषयी प्रेरणादायी माहिती दिली. नांदेड परिसरातील सुमारे ५०० पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमास भेट देत पुस्तकांचे ज्ञानभांडार जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रविवारी (दि. ११) रोजी लघुकथा लेखनविषयक मार्गदर्शन, लेखक कसे घडतात, पुस्तक लेखनाचे प्रकार याविषयी डाॅ. नितीन हांडे, लेखिका दीपा देशमुख, लघुकथा लेखिका उर्मिला घाणेकर, पूर्वा काणे यांचे मार्गदर्शन सत्र आणि वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. तर, महोत्सवाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्यांच्या कविसंमेलनाने होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अॅड. रविंद्र वाघमारे, राहुल सावंत यांनी दिली.या प्रसंगी नांदेड सिटी मधील सोसायटीचे सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते