मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो, असे वास्तव विचार 18व्या शतकात निर्भिडपणे मांडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी 1848 मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा “अहिल्याश्रम’ येथे सुरू केली. पुढे याच ठिकाणी कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य जातींच्या उद्धारासाठी 18 ऑक्टोबर 1906 रोजी “डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना केली.
अस्पृश्य बांधवांच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवी जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना सुरुवातीपासून झाले होते. महर्षी शिंदे यांच्या अस्पृश्य उद्धार चळवळीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उचित आदर करीत असत. म्हणून “डिप्रेस्ड क्लास मिशन अहिल्याश्रम’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक व राजकीय चळवळीचा बालेकिल्ला म्हणून भारतभर प्रसिद्ध झाला आहे.
ज्याप्रमाणे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये बऱ्याच अंशी वैचारिक साम्य आढळून येते, त्याचप्रमाणे कालकथित एम. डी. शेवाळे यांचेही विचार शिक्षण, समाजकारण, धर्मकारणाकडे नेणारे होते. 5 मार्च 1944 साली शेवाळे यांचा जन्म पुण्यात झाला. महर्षींनी सुरू केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशन, पुणे या ठिकाणी शेवाळे यांचे शिक्षण झाले. कठीण परिस्थितीत त्यांनी 22व्या वर्षी संस्थेची धुरा हाती घेतली. 1973 साली त्यांच्या नेतृत्वाखाली महर्षी वि. रा. शिंदे जन्मशताब्दी वर्षात संस्थेच्या वतीने क्वार्टरगेट चौकात महर्षींचा भव्य पुतळा बसविला आणि त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
“अहिल्याश्रमाच्या’ याच भूमीत महात्मा गांधीजी, कविवर्य रवींद्रनाथ टॅगोर, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, ठक्करबाप्पा, वैकुंठ मेहता, सरोजिनी नायडू, बाबू जगजीवन राम, वि. दा. सावरकर, डॉ. मौलाना आझाद, डॉ. मुंजे, डॉ. एन. शिवराज यासारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी भेटी देऊन अस्पृश्यतेचा शाप हिंदू समाजातून नष्ट व्हावा, यासाठी मार्गदर्शन केले. एम. डी. शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक चळवळीबरोबरच आरपीआय सामाजिक चळवळीचे मुख्यालय म्हणून डीसीएम अहिल्याश्रम हे ओळखले जाते. याठिकाणी मागील काळात मायावती या तसेच शेवाळे ज्यांना आपले राजकीय गुरू मानत ते दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई व सध्याचे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीसुद्धा भेटी दिल्या आहेत.
आपल्या आयुष्यातील सहा दशके एखाद्या संस्थेस पूर्णतः अर्पण करून अजीवन तटस्थ राहून सेवाभावनेने संस्था नावारुपाला नेण्यामध्ये एम. डी. शेवाळे यांचा फार मोलाचा वाटा आहे. हा वारसा त्यांचे कुटुंबिय समर्थपणे चालवत आहेत. आजही देशपताळीवर शोभेल असे त्यांचे कार्य कायमच स्मरणात राहील.