पाथर्डी -सोशल मीडियामुळे ग्रंथाचे वाचन कमी होत चालले आहे. पुस्तके सुसंस्कृत पिढी घडवितात. आगामी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांना वाचनाची आवड कशी लागेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत बेस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी व्यक्त केले.
माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन आवड ग्रुप व बेस्ट फाउंडेशनतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पत्रकार बाबासाहेब गर्जे होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक दिलीप बोरुडे, ओऍसिस अभ्यासिकेचे संचालक सुरेश बोरुडे, युवा व्याख्याते सचिन नागापुरे, वाचन आवडचे उपाध्यक्ष अशोक वामन, उद्योजक राजेंद्र कोटकर, शिक्षक नेते डॉ. विठ्ठल दहिफळे, मुख्याध्यापक एस. बी. देखणे, अंनिसचे कार्याध्यक्ष शशिकांत गायकवाड, रमेश वाधवणे, बबनराव भगत आदी उपस्थित होते.
लोकांना वाचनाची आवड लागावी. ग्रुपमध्ये एखाद्या चांगल्या पुस्तकाची चर्चा व्हावी, नवीन पिढीतील साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, तरुणांना पुस्तकाचे महत्त्व समजावे, सुसंस्कृत तरुण घडावेत या संकल्पनेतून दहा वर्षांपूर्वी वाचन आवड ग्रुपची निर्मिती झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापुढील काळात या मोहिमेशी आणखी लोक जोडले जावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे गोरे म्हणाले.