कोलकता :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोलकातासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी पाच विश्वचषक सामने दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या पाच सामन्यांपैकी दोन सामने पाकिस्तानचे असतील. प्रतिष्ठित ईडन गार्डन्सवर आयसीसी विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडल्यास मला आनंद होईल.
ईडन गार्डन्सवर भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीची वाट पहात आहे, असे प्रतिपादन भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन-डे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तीन दिवसांनंतर टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी चेन्नईत होणार आहे. त्याचवेळी 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वाचा सामना होणार आहे.
वर्ष 2011 मध्ये दोन्ही संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला होता. त्या सामन्यासह भारतीय संघ विश्वचषकही जिंकला. त्यामुळे यावेळीही गांगुली यांना भारत-पाकिस्तानमधील उपांत्य फेरीचा थरार पुन्हा अनुभवायचा आहे.
उपांत्य फेरीचे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर पहिल्या आणि चौथ्या स्थानावरील संघांमधील पहिला उपांत्य सामना तर ईडन गार्डन्सवर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमधील सामना होईल. अशात पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली तर तो कोलकात्यातच खेळेल.
पाकिस्तान बाद फेरीसाठी पात्र ठरला, तर तो ईडन गार्डन्सवर उपांत्य फेरी खेळेल. उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान आमने-सामने आले तर हा सामना इथेच होईल.