Mumbai Indians & Hardik Pandya :- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने शनिवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मैदानावर ट्रोल करणाऱ्या चाहत्यांची निंदा करताना म्हटले की, हार्दिकला चाहत्यांच्या आवडत्या रोहित शर्माची जागा देण्यात आली, यात त्याची चुक कोणती? त्यामुळे त्याला ट्रोल करून छळू नये.
जेव्हापासून मुंबई इंडियन्सने जाहीर केले की पंड्या पाच वेळा चॅम्पियन संघाचे नेतृत्व करेल, तेव्हापासून त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच सामन्यात अहमदाबादमधील गुजरात टायटन्सच्या त्याच्या आधीच्या फ्रँचायझीच्या घरच्या मैदानावर संघ पराभूत झाला.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी तो हैदराबादला गेला तेव्हाही हा ट्रेंड कायम होता. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध हंगामातील पहिला घरच्या मैदानावरील सामना खेळला तेव्हाही वानखेडे मैदानावर चाहत्यांनी त्याच्यावर अक्षरशः गलिच्छ पद्धतीने शिव्यांचा भडीमार केला. त्यात मुंबईने हंगामातील सलामीचे तिन्हीही सामने गमावल्याने चाहत्यांनी त्याचे सर्व खापर नवनिर्वाचित कर्णधार हार्दिकवर फोडले.
IPL 2025 : पंड्याच्या नेतृत्वावर नाराज; पुढील मोसमात रोहित शर्मा अन्य संघाकडून खेळणार..?
शनिवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान गांगुली म्हणाला, चाहत्यांची हार्दिक बद्दलची वागणूक योग्य नाही. कारण फ्रँचायझीने त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. खेळात असे घडते. तुम्ही भारताचे कर्णधार असोत किंवा एखाद्या राज्याचे कर्णधार असोत, तो निर्णय समिती अथवा फ्रँचायजीचा असतो, त्यात खेळाडूची भूमिका नसते. त्यामुळे, चाहत्यांनी एकट्या हार्दिकला टार्गेट करणे बंद करायला हवे, असेही बीसीसीआयचे अध्यक्ष राहिलेल्या गांगुलीने म्हटले.