साडेपाच तासांनंतर जेरबंद करण्यात रेस्न्यू टीमला यश
नारायणगाव – आर्वी (ता.जुन्नर) येथे शनिवारी (दि. 6) पहाटे सहा वाजेपासून सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जखमी बिबट्याचा थरार पाहावयास मिळाला. आर्वी गावठाणातील तुकाई मंदिराच्या पाठीमागील नितीन व मंगेश डोंगरे यांच्या घरामागे जखमी मादी बिबट्या चालत येताना दिसून आला. बिबट्या जखमी, सर्पदंश अथवा आजारी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. काही वेळाने तो ओढ्याच्या कडेला असलेल्या दिल्ली गवतामध्ये बसलेला दिसून आला.
जखमी बिबट्या जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जाण्याची भीती निर्माण झाली होती.प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आर्वी गावचे सरपंच भावेश डोंगरे, पोलीस पाटील मयूर खुडे, प्रशांत डोंगरे, आपदा मित्र सुशांत भुजबळ, ग्रामसुरक्षा रक्षक दल जवान आदित्य डेरे, वनविभाग कर्मचारी, वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, खंडू भुजबळ उपस्थित झाले. परंतु बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने भीती पोटी बिबट्या धडपडत पळू लागला. आणि पळता पळता विहिरीत उडी घेतली. परंतु विहिरीतील एका झाडाला अडकला.
वनविभागाच्या कर्मचार्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी चहू बाजूने जाळी लावली. परंतु जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याने जाळीच्या वरून उडी मारून पळू लागला. त्या दरम्यान जखमी बिबट्याने वन कर्मचारी संतोष भालेराव यांच्यावर झेप घेऊन जखमी केले. त्याच दरम्यान उपस्थित वनविभागाच्या कर्मचार्यांनी बिबट्याच्या अंगावर जाळी टाकून डॉ. महेंद्र ढोरे व डॉ. चंदन यांनी त्याला बेशुद्ध केले. व जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पुढील उपचारासाठी घेऊन गेले.
बिबट्याला रेस्क्यू करण्याची जागा ओढ्याची व जास्त पाण्याची असल्याने बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये अडचणी येत होत्या.वनविभाग वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी बिबट्याला वेळीच प्रतिकार केल्याने पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करण्यात आली.