पुण्यातील वाढती बाधित संख्या काळजी करणारी : पवार
पुणे – “मागील पंधरा दिवसांपासून करोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक करणारा आहे. या संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर वेळप्रसंगी दोन शहरांतील प्रवेशाबाबतचा निर्णय घ्यावा लागेल,’ असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात दिले.
“करोनामुळे तब्बल सहा महिने सर्व कामे थांबली होती. लॉकडाउन काळात केंद्राने आर्थिक रसद बंद केली. त्यामुळे चणचण भासत होती. तरीही राज्य सरकारने सगळ्यांना आधार दिला. पोलीस, डॉक्टर, नर्स यांसह अत्यावश्यक विभागांना निधी कमी पडू दिला नाही. मात्र, करोनाने पुन्हा डोके वर काढले असून, पुण्यातील वाढती संख्या काळजी करणारी आहे.
डिसेंबर आणि जानेवारीमध्ये करोना आता गेला असेच नागरिक फिरायला लागले, आता पुन्हा हा संसर्ग वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, राजेंद्र शिंगणे यांना करोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे सुरक्षित अंतर, सॅनिटायझर आणि मास्क या नियमांचे काटेकोर पालन करावे. संकट वेळीच थोपविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,’ असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.