बदलत्या राजकीय स्थितीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सध्या भाजपशी वैर पत्करू इच्छित नाहीत. त्यामुळे बिहारी नेत्यांपासून नाराज असलेले मुकेश सहानी अखिलेश यादव यांना शरण गेले आहेत. उत्तराखंडमध्ये हरिश रावत यांना पंजाबमधील पराभवाबद्दलही जबाबदार धरले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये बीरभूमच्या घटनेमुळे अडचणीत आलेल्या ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेतली. त्रिपुरात पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. तेथे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांना राज्यात आपले राजकीय वजन कमी झालेले नाही, हे देखील दिल्लीतील हायकमांडला दाखवून द्यायचे आहे.
बिहारमध्ये मुकेश सहानी हे भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी ज्या रितीने धडपड करत होते, त्यास फारसे यश आले नाही. भाजपविरोधात बंड केले तर राष्ट्रीय जनता दलाकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशीही त्यांना अपेक्षा होती. परंतु असे काहीच घडले नाही. यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मुकेश सहानी यांना खरे खोटे सुनावले देखील. म्हणून तेजस्वी यादव यांना देखील मुकेश सहानीचा फोन उचलणे गरजेचे वाटले नाही. शेवटी त्यांचे लक्ष होते नितीशकुमार यांच्यावर. पण तेथेही अपेक्षाभंग झाला. नितीशकुमार हे भाजपविरोधात स्वत:चे अस्तित्व निर्माण करत असून अशा स्थितीत ते आपली साथ सोडणार नाही, असे मुकेश यांना वाटले. परंतु बदलत्या राजकीय स्थितीत नितीशकुमार सध्या भाजपशी वैर पत्करू इच्छित नाहीत. याउलट सहानींना मंत्रिमंडळाबाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी भाजपकडून दबाव येताच नितीशकुमार यांनी राज्यपालांना तशी शिफारस पाठवून दिली. त्यामुळे बिहारी नेत्यांपासून नाराज असलेले मुकेश सहानी आता उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना शरण गेले आहेत.
अखिलेश यादव यांच्याकडून अपेक्षा बाळगण्याचे प्रमुख कारण म्हणजे अखिलेश यादव हे मागासवर्गीयांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरे म्हणजे उत्तर प्रदेशात निषाद समुदायाचे नेते संजय निषाद हे भाजपसमवेत आहेत. त्यांना योगी 2.0 सरकारमध्ये देखील मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्या मुलाला भाजपने आपल्या चिन्हावर खासदार देखील केले असून ते एकेकाळी समाजवादी पक्षाचे खासदार होते. कधी निषाद समुदायातून येणाऱ्या फुलन देवी या समाजवादी पक्षात सक्रिय होत्या. त्यानंतर समाजवादी पक्ष हा राज्यातील एका निषाद चेहऱ्याच्या शोधात आहे. हा शोध थांबवण्यासाठी समाजवादी पक्षाने संजय निषाद यांचा मुलगा प्रवीण यांना गोरखपूर येथून खासदार केले. (ही जागा योगींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती) आता संजय निषाद यांच्याविरोधात अखिलेश हे मुकेश सहानींचा वापर करू शकतात.
कॉंग्रेस नेते हरिश रावत ही अशी व्यक्ती आहे की दोन्ही राज्यांतील पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले जात आहे. एकीकडे घरचे राज्य उत्तराखंड येथे ते अघोषितपणे कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून गृहित धरले जात होते. तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर ते म्हणाले की, सोनिया गांधी यांना कसे तोंड दाखवू. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. देशातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना माझ्यावर इतका विश्वास होता आणि ते मला म्हणायचे, की उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसचे सरकार येईल ना? अशावेळी उत्तराखंडमधील कॉंग्रेसच्या पराभवाबद्दल त्यांना दोषी धरले जात असेल तर त्यात गैर नाही. अर्थात उत्तराखंडमधील कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद जगजाहीर आहे.
हरिश रावत यांनी आपल्या विरोधकांना खड्यासारखे बाजूला काढण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आता विरोधकांना त्यांना कॉर्नर करण्याची संधी मिळाली आहे. परंतु हरिश रावत यांची अडचण केवळ उत्तराखंडपुरतीच मर्यादित नाही तर, त्यांना पंजाबमधील पराभवाबद्दलही जबाबदार धरले जात आहे. त्यांच्यावर उघडपणे आरोप केले जात आहेत. त्यांनी प्रभारी म्हणून पंजाबची अशी पटकथा लिहिली, त्यात कॉंग्रेसच्या हातातून सत्ता गेली, असे त्यांच्याबाबत बोलले गेले. राज्यातील कॉंग्रेसची स्थिती अधिक बिकट करण्यात त्यांचे योगदान राहिले आहे. ऐन निवडणूक काळात पंजाबमध्ये नेतृत्व बदलाची मागणी केली जात होती. हा वाद सामंजस्याने सोडवला जाऊ शकला असता व सर्व एकत्र येऊन लढले असते. पण प्रभारी म्हणून काम करताना हरिश रावत यांनी वाद सोडवण्याऐवजी त्याला खतपाणी घालण्याचेच काम केले. साहजिकच हरिश रावत यांना उत्तराखंडबरोबरच पंजाबसाठी देखील स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.
त्रिपुरात पुढील वर्षी निवडणुका होत आहेत आणि त्रिपुरा हे असे राज्य आहे की, 2018 च्या निवडणुकीत भाजपने दमदार विजयाची नोंद करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रत्यक्षात भाजपचे नेते, मुख्यमंत्री विप्लव कुमार देव हे आपल्या वक्तव्यावरून सतत चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्याने दुखावणारे किंवा नाराज राहणारे आमदार त्यांना बदलाची मागणी करत राहतात. तरीही त्यांची खुर्ची अनेकदा वाचली आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकच्या माध्यमातून भाजपने एक संदेश दिला की, मुख्यमंत्री बदलण्यापासून पक्षाला कोणीही रोखू शकत नाही. उत्तराखंडच्या निकालानंतर आणखी एक बाब सिद्ध झाली की सहा महिन्यांच्या आत दोन-दोन मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय योग्यच होता. त्रिवेंद्रसिंह रावत आणि त्यानंतर तीरथसिंह रावत यांना जर पक्षाने मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकले नसते तर उत्तराखंडमध्ये भाजपच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नसते.
तूर्त त्रिपुरात अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी विप्लवकुमार देव यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. या क्रमवारीत त्यांनी प्रादेशिक पक्ष त्रिपुरा पीपल्स फ्रंटचे भाजपमध्ये विलिनीकरण केले. त्रिपुरात तब्बल 32 टक्के नागरिक आदीवासी समुदायातील असून या पक्षाचे नेते पताल कन्या जमातीया यांचा या समुदायावर चांगला प्रभाव आहे. राजकीय वर्तुळात असेही म्हटले जात आहे, की आगामी काळात विप्लवकुमार देव हे पक्षातील विरोध मोडून काढण्यासाठी प्रयत्न करतील आणि ते राज्यात आणि पक्षात स्पर्धकच शिल्लक ठेवणार नाहीत. या आधारावर विरोधकांचा आवाज क्षीण होईल. दुसरीकडे त्यांना राज्यात आपले राजकीय वजन कमी झालेले नाही, हे देखील दिल्लीतील हायकमांडला दाखवून द्यायचे आहे.
ममतांचा ऍक्शन प्लॅन
बीरभूमच्या घटनेने पश्चिम बंगालचे राजकारण तापले आहे. त्यामुळे आगामी काळात अयाराम गयारामच्याच बातम्या ऐकावयास मिळू शकतात. अशा दलबदलात काही मोठे चेहरेदेखील असू शकतात. प्रत्यक्षात नेत्यांच्या उड्या या ममता बॅनर्जी यांच्या ऍक्शन प्लॅनचा हिस्सा आहे. बीरभूमच्या घटनेमुळे अडचणीत आलेल्या ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेतली. विचारांती एक बाब निश्चित झाली की, विरोधक गटातील काही नेत्यांची फोडाफोडी केली तर हे काम सोपे होऊ शकते. या नेत्यांनी आपल्या पक्षावर बंगालच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत तृणमूलमध्ये प्रवेश केल्यास तृणमूलच्या विरोधात निर्माण झालेले वातावरण निवळण्यास मदत मिळेल.
यानुसार विरोधकांवर मानसिकदृष्ट्या दबाव टाकला जाईल. याप्रमाणे संभाव्यपणे तृणमूलमध्ये येऊ शकणारे पण सध्या डावे, कॉंग्रेस आणि भाजपमध्ये असणाऱ्या नेत्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आणि त्यांना सहजपणे तृणमूलमध्ये कसे आणता येईल, त्यानुसार रणनीती आखण्यात येत आहे. तृणमूल नेत्यांचा प्लॅन तयार असून यानुसार ते राज्यात मोठा “धमाका’ करणार असल्याचे सूतोवाच देखील केले आहे. विशेष म्हणजे आगामी काळात ममता बॅनर्जी कोणाला पक्षात आणू शकतात, हे पाहणे रंजक ठरेल.
– योगेश देसाई