सातारा -कुस्तीतील सर्वोच्च मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा साताऱ्यात होत आहे. ही 64 वी स्पर्धा असून ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुस्ती क्षेत्रातील मोठा फौजफाटा कार्यरत आहे. या स्पर्धेत 5 आखाड्यांमध्ये 900 मल्ल आपआपसांत भिडणार आहेत. निकालाची धुरा 100 पंच सांभाळणार आहेत. या स्पर्धेसाठी सातारा सज्ज झाला असून कुस्ती शौकिनांमध्ये स्पर्धेची उत्कंठा लागून राहिली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान सातारा जिल्ह्याला तब्बल 59 वर्षानंतर मिळाला आहे. दि. 4 ते 9 एप्रिलदरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाकडून युध्दपातळीवर तयारी सुरू आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 900 मल्ल, 100 पंच आणि 100 टीम मॅनेजर असे एकूण 1100 जण येणार आहेत. त्या मल्लांची निवासाची व्यवस्था रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाच्या शाळा व आयटीआयच्या वसतिगृहात करण्यात येणार आहे. तर मंगल कार्यालयात भोजनाची व्यवस्था केली आहे. क्रीडाधिकारी कार्यालयात 100 पंचांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.
याशिवाय मैदानावरील सुविधांसह 50 हजार प्रेक्षक बसणाऱ्या ठिकाणाच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पाच आखाडे असणार असून यात मातीचे दोन आखाडे तर मॅटचे तीन आखाडे आहेत. या पाच मॅटवर कुस्त्यांचा डाव रंगणार असून मातीचा आखाडा 9 मीटर व्यासाचा आहे. मॅटचा आखाडा 12 मीटरचा आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांसह महानगरातील असे 45 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात माती गटात व मॅट गटात स्पर्धक वेगवेगळ्या वजन गटानुसार असणार आहेत. याशिवाय कोच, खेळाडू तसेच व्हीआयपी व्यक्ती बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
मल्ल तसेच कोच यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधाही मैदानावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा ऐतिहासिक व्हावी यासाठी नियोजन सुरु असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्यासाठी एका पैलवानाला 6 ते 8 पैलवानांना चितपट करावे लागणार आहे. त्यानंतर माती व मॅटवरील टॉपला असणाऱ्या मल्लांमध्ये मुख्य लढत होणार आहे. ही मुख्य लढत मॅटवर होणार असून अवघ्या 6 मिनिटात महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरणार आहे. महाराष्ट्र केसरीसाठी 86 किलो वजन गटावरील मल्लांमध्ये लढत होणार आहे. यात 40 ते 45 मल्ल मॅट व मातीसाठी खेळणार आहेत. महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी होणारी अंतिम लढत दि. 9 रोजी दुपारी 4 च्या सुमारास होणार असून कुस्तीशौकिनांमध्ये प्रचंड उत्कंठा लागून राहिली आहे.
शरद पवार यांच्या हस्ते किताब
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उदघाटनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. तर महाराष्ट्र केसरीची गदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.