मुंबई – विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआच्या शिष्टमंडळाने राज्यापालांची भेट घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.
पहिल्याच दिवशी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मविआच्या शिष्टमंडळाकडून आज राज्यापालांची देखील भेट घेण्यात आली आहे. या शिष्टमंडळामध्ये 40 आमदारांचा समावेश होता. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही राज्यापालांकडे यावेळी केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
अंबादास दानवे म्हणाले की, विधान परिषदेचे उपसभापती यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या पदावर राहून न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे राज्यापालांनी आता या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही यावेळी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तपूर्वी, नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र ठाकरे गटाकडून विधानभवन सचिवांना देण्यात आले आहे. आता या पत्राला पुढील चौदा दिवसांच्या आता गोऱ्हे आणि कायंदे यांना उत्तर द्यावे लागणार आहे.
दुसरीकडे अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटाकडून आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. “खोके सरकार, हाय हाय’ अशी जोरदार घोषणाबाजी कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात आली. मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. या आंदोलनात राष्ट्रवादीचा एकही आमदार सहभागी झाला नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार काय भूमिका घेणार याकडे आता राज्याचे लक्ष वेधले आहे.