मुंबई – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना आता ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू होणार आहे. यासंदर्भात राज्यभरात 3 नोव्हेंबरपासून आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनावेळी सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रमुख प्रकाश शेंडगे यांनी दिली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दामोदर तांडेल, चंद्रकांत बावकर, महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नतीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष शांताराम दिघे, जीडी तांडेल उपस्थित होते. प्रकाश शेंडगे म्हणाले, सध्या राज्यभरात मराठा समाजातील काही प्रमुख नेते मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी कोट्यातून द्या अशी मागणी करत आहेत.
याला सर्व ओबीसी समाजाचा विरोध आहे. ज्यावेळी मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले होते. त्याचवेळी आम्हाला माहिती होते की हे आरक्षण टिकणारं आरक्षण नाही.
त्यामुळेच आम्ही सरकारकडे विचारणा केली होती की, जर एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मग सरकार पुढचं पाऊल काय टाकणार आहे. परंतु, सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता आली नाही, असे त्यांनी सांगितले.