बंगळुरू – केरळ हे देशातील सर्वात उत्तम प्रशासन असणारे राज्य आहे. तर या यादीत सर्वात शेवटचा क्रमांक हा उत्तर प्रदेशचा लागतो. बंगळुरू येथील पब्लिक अफेअर सेंटरने याबाबतची यादी बनवली आहे.
भारताचे अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेने हा अहवाल प्रकाशित केला आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या कामगिरीवर ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
यात पहिली चारही राज्ये दक्षिणेकडील आहेत. केरळ (1.388 गुणांक) तामिळनाडू (0.912 गुणांक), आंध्र प्रदेश (0.531 गुणांक) आणि कर्नाटक (0. 468 गुणांक) यांचा क्रमांक लागतो.
उत्तर प्रदेश, ओडिशा आणि बिहार ही राज्ये या यादीत शेवटी आहेत. त्यांचे गुणांक अनुक्रमे उणे 1.461, उणे 1.201 आणि उणे 1.158 आहेत.
लहान राज्यांमध्ये गोवा (1.745)त्या पाठोपाठ मेघालय (0.797) आणि हिमाचल प्रदेश (0.725) असा क्रमांक आहे. लाहान राज्यात सर्वात वाईट कामगिरी मणीपूर (उणे 0. 363), दिल्ली (उणे 0.289) आणि उत्तराखंड (उणे 0.277) यांनी नोंदवली.
केंद्र शासित प्रदेशात चंदिगढने (1.05) गुणांक मिळवत सर्वात उत्तम कामगिरी नोंदवली त्यापाठोपाठ पुदुचेरी आणि लक्षद्विपचा क्रमांक लागतो. दादरा नगर हवेली, अंदमान आणि जम्मू काश्मिर हे तळातील केंद्र शासित प्रदेश आहेत.
समानता, विकास आणि शाश्वतता या तीन स्तंभांवर विसंबून विकासाचे मोजमाप करण्यात आले. या अहवालाने त्याचे पुरावे निर्माण केले आहेत त्यामुळे भारतात सुरू असणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांवर प्रकाश झोत पडत आहे, असे कस्तुरीरंगन यांनी स्पष्ट केले.