Obc Reservation : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण (Obc Reservation) देऊ नये, या मागणीसाठी मागील १९ दिवसांपासून चंद्रपूर येथे ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांच्यासह दोन सहकारी उपोषणास बसले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर रवींद्र टोंगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना पाणी पाजून उपोषण सोडवले.
आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी,“काल (शुक्रवार, २९ सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की, कुठल्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षण (Obc Reservation) कमी होऊ देणार नाही. ओबीसी समाजाच्या मनात एक प्रकारे संशय निर्माण झाला आहे. आता आमचं आरक्षण कमी होणार, त्यामध्ये वाटेकरी वाढणार… पण यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.” अशी माहिती दिली.
देवेंद्र फडणवीसांनी पुढे सांगितले, “राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. पण त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीत मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांविरोधात उभा आहे, अशा प्रकारची परिस्थिती तयार होऊ नये, याची काळजी राज्य सरकार निश्चितपणे घेणार आहे. ती घेतलीच पाहिजे. बहुसंख्य मराठा समाजाचीही तशीच अपेक्षा आहे. राज्यात आपण सगळे एकत्रितपणे नांदत असतो. त्यामुळे समाजात भेदभाव निर्माण होईल, असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही. असाच आमचा प्रयत्न असणार आहे.”
देवेंद्र फडणवीसांनी “कालच्या बैठकीत ओबीसी नेत्यांकडून ज्या मागण्या केल्या होत्या, त्यातील बहुतांश प्रश्नांवर सरकारने अतिशय सकारात्मक निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण बैठक रेकॉर्ड झाली आहे. त्यामुळे कुठेतरी आश्वासन मिळेल आणि निर्णय होणार नाही, असं करणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत,” असेही म्हटले.