नवी दिल्ली : लॉकडाउनमुळे देशात सर्वात हाल झाले ते म्हणजे मजुरांचे. याच विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारने नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, यावेळी मोदी यांनी स्थानिकांशी संवाद साधला.
व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी स्थानिक लोकांशी यावेळी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी, अभियानाचा प्रारंभ करताना ग्रामस्थांशी संवाद साधल्याने दिलासा मिळाला आहे. करोनाचा शिरकाव झाल्यानंतर अडकलेल्यांना मदत पोहोचवण्याचे काम केले. घरी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे सुरू केली. करोनाचे संकट इतके मोठे आहे की संपूर्ण जग हादरले आहे. पण, भारतीय खंबीरपणे उभे राहिले. ग्रामीण भारताने करोनाचे संक्रमण प्रभावीपणे रोखले आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या संपूर्ण युरोप, अमेरिका, रशियापेक्षा जास्त आहे. इतकी लोकसंख्या असताना करोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. आपण जे केले तितके काम किंवा त्यापेक्षा अर्धे काम पाश्चिमात्य देशात झाले असते, प्रचंड कौतुक झाले असते. आपल्या देशातही काही लोक आहेत, जे तुमची पाठ थोपटणार नाहीत. पण, मी तुमचा जय जयकार करत राहणार आहे. गावांना आणि गावातील लोकांना सांभाळणाऱ्यांना मी नमन करतो, असे मोदी म्हणाले.
#WATCH Live – Prime Minister Narendra Modi launches 'Garib Kalyan Rojgar Abhiyaan' through video conferencing. https://t.co/8mlefUeMFL
— ANI (@ANI) June 20, 2020
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाउनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छित आहे. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की, या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरच्या जवळच काम मिळावे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी देत होते. पण, ते आता गावांसाठी करावे,” असे आवाहन मोदी यांनी केले.