मुंबई – शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून साजरा केला जात आहे. यावरून ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. दोन्ही गटांकडून सध्या जोरदार शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केल्याचं दिसून आलं होते. तसेच, 20 जून जागतिक गद्दार दिन करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी केली गेली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, “आमदार, खासदार फोडून सत्ता स्थापन केली. हे लाचार मिंधे सत्ता आणि खोक्यांसाठी तिकडे गेले. मात्र, कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. सोमवारी आपल्या पक्षाचा वर्धापन दिन आहे, तर परवा जागतिक गद्दार दिन आहे’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या या भाषणाला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. ‘आता फक्त ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं बाकी राहिलं आहे’. अशी टीका त्यांनी केली आहे. यावेळी शंभूराज देसाई माध्यमांशी संवाद साधत होते.
ते म्हणाले.., “आज ज्वलंत विचारांच्या हिंदुत्वाचं सोनं हे वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणातून ऐकायला मिळेल. एका बाजूला राष्ट्रवादी आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना अशा नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही.
आम्ही जो उठाव केला तो स्वाभिमानासाठी केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी केला. त्यामुळे त्यादिवसाला कुणीही काहीही म्हटलं तरी त्याला काही फरक पडत नाही. आता फक्त ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं बाकी राहिलं आहे’. अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली.