नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या कायद्यांविरोधात ठिकठिकाणी हे आंदोलक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर टीका टीका केली आहे. ”अब होगी किसान की बात” असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमावरून टोला लगावल्याचे दिसत आहे.
“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन दिले होते, मोदी सरकारने उत्पन्न तर अनेक पटीने वाढवले मात्र अदानी-अंबानीचे. जे काळ्या कृषी कायद्यास आतापर्यंत बरोबर म्हणत आहेत. ते काय शेतकऱ्यांच्या हितादृष्टीने तोडगा काढतील? अब होगी किसान की बात…” असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असे मागील चार दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले आहे.
वादा था किसानों की आय दुगनी करने का, मोदी सरकार ने आय तो कई गुना बढ़ा दी लेकिन अदानी-अंबानी की!
जो काले कृषि क़ानूनों को अब तक सही बता रहे हैं, वो क्या ख़ाक किसानों के पक्ष में हल निकालेंगे?
अब होगी #KisaanKiBaat
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 29, 2020
संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.“कृषी विषयक कायदे करुन मोदी सरकारने शेतकऱ्यांना वेठीला धरलं आहेच. शिवाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहंकारामुळे त्यांनी जवानांनाच शेतकऱ्यांच्या विरोधात उभं केलं आहे.”, अशी टीका या अगोदर राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत मोदी सरकारवर केलेली आहे.
मोदी सरकारने शेतकऱ्यांविरोधात केलेल्या खोट्या एफआयआरमुळे शेतकऱ्यांचं धैर्य खचणार नाही हे लक्षात असू द्या अन्यायाविरोधात आवाज उठवणं हा अपराध नाही तर कर्तव्य आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.