नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दहशतवादानंतर आता पाकिस्तानने भारताविरोधात सायबर युद्ध सुरु केले आहे. सोशल मीडियावरुन भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारे मेसेज मोठ्या प्रमाणावर पसरवले जात आहेत. सोशल मीडियावरुन केल्या जाणाऱ्या या भारत विरोधी प्रचाराला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची फूस आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. याविषयीचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
सोशल मीडियाचा वापर करुन भारतविरोधी भावना भडकवायच्या, खासकरुन आखातीमध्ये देशांमध्ये भारताचे नाव खराब करण्याची पाकिस्तानची रणनिती आहे. यासंबंधीचा अहवाल बुधवारी सरकारकडे सोपवण्यात आला आहे. सोशल मीडियावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करुन भारत आणि आखाती देशांच्या संबंधात फूट पाडण्याची पाकिस्तानची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत आणि आखाती देशांच्या संबंधात मोठी सुधारणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशांबरोबर संबंध सुधरवण्यावर विशेष भर दिला आहे. पाकिस्तानला हे पहावत नसल्यामुळे आता त्यांनी अशा प्रकारे सायबर युद्धाची सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगची मोठी यादीच भारताकडे आहे. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानकडून आखाती देशांचा वापर होत आहे.