हफ्ता मिळविण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य
पुणे – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता मिळविण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी सरकारने 30 नोव्हेंबर अंतिम तारीख निश्चित केली आहे. तर जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांना ही मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. दिलेल्या वेळेत आधारकार्ड लिंक करता न आल्यास संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून मिळणारी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात 14.5 कोटी शेतकरी कुटुंब आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. या योजनेंतर्गत 87 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. आतापर्यंत 7.63 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
मात्र, यापैकी केवळ 3.69 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा तिसरा हफ्ता मिळाला आहे. त्यामुळे सुमारे 7 कोटी शेतकरी या योजनेच्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. कागदपत्रांचा घोळ आणि आधारकार्ड लिंक झाले नसल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.