नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात ख्रिसमस निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पुंछ येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहीली. आपण आपले चार जवान गमावले आहेत. ख्रिसमसचा आनंद साजरा करताना आपल्याला त्यांचे विस्मरण होता कामा नये. जे जवान सीमेवर उभे आहेत त्यांनाही आपण विसरता कामा नये. ते देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान करतात, असे त्यांनी नमूद केले.
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनतर्फे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना चंद्रचूड म्हणाले की मुंबईतील शालेय जिवनात मी प्रामुख्याने एक गोष्ट शिकलो व ती म्हणजे देशभक्तीची भावना. देशाचा दर्जा सगळ्यांत वरचा आहे. ज्याप्रमाणे आपले सैनिक देशासाठी प्राणाचे बलिदान देतात त्याप्रमाणे गरज पडल्यास आपणही बलिदान देऊ शकतो. काही दिवसांपूर्वी आपण चार जवान गमावले. आज आपण ख्रिसमस साजरा करतो आहोत. मात्र हा सण साजरा करताना आपण त्यांना आणि जे सीमेचे रक्षण करण्यासाठी उभे आहेत त्यांना विसरायला नको.
घटना सगळ्यांत पवित्र पुस्तक
चंद्रचूड म्हणाले की न्यायाधीश आणि वकिलांसाठी देशाची घटना हे सगळ्यांत पवित्र पुस्तक आहे. या देशाचे नागरिक म्हणून आपण सर्व एक आहोत हे ही घटनाच आपल्याला शिकवते. आपल्याला सगळ्यांना मिळून हा देश अधिक चांगला करावा लागेल. ते पुढे म्हणाले की आजारी आणि गरजू रूग्णांचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि परिचारिकांचेही आपल्याला विस्मरण व्हायला नको. आपण ख्रिसमसच्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत आहोत. तथापि, ही मंडळी आपल्या कुटुंबीयांना वेळ देऊ शकत नाहीत.
दरम्यान, त्यांनी यावेळी उपस्थित वकिलांनाही आवाहन केले. कोणतेही महत्वाचे कारण असल्याशिवाय खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यास त्यांनी सांगू नये. आपल्याला सर्वसामान्य लोकांची गरज आणि अडचण समजून घ्यायला हवी. आम्ही आमच्या कामाच्या प्रती गंभीर आहोत असा संदेश आपण समाजाला द्यायला हवा. वकिलांच्या सहकार्याने ५२ हजार खटले निकाली काढण्यात आपण यशस्वी ठरलो. पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त खटले निकाली काढण्यात आपण यशस्वी ठरू हे लक्ष्य आपण ठेवले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.