– कमलेश गिरी
संयुक्त राष्ट्राने जगभरातील जुन्या धरणांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. एका सर्वेक्षणात जगभरातील हजारो धरणांचे वय संपल्याचे निदर्शनास आले आहे.
जगभरात जीर्ण होणाऱ्या धरणांवर संयुक्त राष्ट्राने अहवाल तयार केला असून त्याचे नाव “एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर: ऍन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ असे आहे. म्हणजेच या अहवालात धरणांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र खराब, जीर्ण होत असलेल्या मोठ्या धरणांचे पाडकाम करायचे असेल तर पाणीसाठ्याची पर्यायी व्यवस्था काय आहे? हा देखील कळीचा प्रश्न आहे. “इन्स्टिट्यूट फॉर वॉटर, एन्व्हॉयरमेंट अँड हेल्थ’च्या माध्यमातून जारी केलेल्या अहवालात म्हटले, की 2050 पर्यंत बहुतांश लोकंसख्या ही मोठ्या धरणांच्या पायथ्याशी वास्तव्य करत असेल. पैकी बहुतांश धरणांनी वय पूर्ण केलेले असेल. साहजिकच ही धरणे फुटण्याचा धोका आपल्या डोक्यावर कायमच राहणार आहे. प्रश्न केवळ पन्नास-शंभर धरणांपुरता मर्यादित नाही.
संपूर्ण जगात एकूण 58 हजार 700 धरणे असून त्यापैकी बहुतांश धरणे ही 1930 ते 1970 या काळात बांधलेली आहेत. बांधकाम करताना त्यांचे वय 50 ते 100 वर्षे असेच गृहित धरले आहे. 50 वर्षांनंतर काळाच्या ओघात सिमेंटपासून बांधलेली मोठी धरणे जीर्ण होऊ लागतात. आजघडीला जगभरातील एकूण धरणांपैकी 55 टक्के धरणे ही केवळ चार आशियायी देशांत आहेत. चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांत बांधलेल्या धरणांपैकी बहुतांश धरणे 50 वर्षे पूर्ण करण्याच्या काठावर आहेत. एकट्या चीनमध्येच 23 हजार 811 धरणे असून ही संख्या जगातील एकूण धरणांच्या 40 टक्के आहे.
कालबाह्य झालेल्या आणि होत चाललेल्या धरणांवर संयुक्त राष्ट्राने अहवाल तयार केला असून तो भारतासाठी महत्त्वाचा आहे. कारण आपण गरजेनुसार अजूनही जलसाठा करण्याची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. सध्याच्या स्थितीचे आकलन केल्यास दरवर्षी पडणारा पाऊस आणि हिमवृष्टी पाहता निसर्गातून मिळणाऱ्या चार हजार अब्ज घनमीटर पाण्यांपैकी आपण केवळ 257 अब्ज घनमीटर एवढाच साठा करू शकतो आणि या मर्यादित स्वरुपातील पाण्याला धरणात साठविले जाते. यापैकी बहुतांश धरणांनी आपले वय ओलांडले असून काही धरणे ती वयोमर्यादा गाठत आहेत.
म्हणजे धरणांच्या सुरक्षेच्या संकटापेक्षा 138 कोटी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आव्हान अधिक गंभीर आहे. अहवालात काही धक्कादायक निष्कर्ष आहेत. त्यात म्हटले की, भारतात सध्या 4 हजार 407 मोठी धरणे असून त्यापैकी 1 हजार 115 धरणे 2025 पर्यंत 50 वर्षांचा टप्पा पार करतील. यापैकी काही धरणांचे आयुर्मान शंभर वर्षे असणार आहे. त्याचबरोबर 2050 पर्यंत देशातील 4 हजार 250 धरणे 50 वर्षे पूर्ण करणार आहेत. या धरणांच्या डागडुजीबाबत सूचना देत अहवालात त्याची नियमित तपासणी आणि निरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. धरणांचे आयुष्य पूर्ण झाल्यानंतर त्याचा धोका निर्माण होणे स्वाभाविक आहे.
काळानुसार पायाभूत सुविधा आणि रचना या कमकुवत होऊ लागतात. त्याच्या देखभालीचे काम आणि खर्च या दोन्हीत वाढ होऊ लागते. तसेच धरणांची उपयोग क्षमता देखील कमी होते. म्हणजे प्रत्येक धरणांत ठराविक प्रमाणातच पाण्याचा साठा राहतो. त्यास आपण डेड स्टोरेज (मृत साठा) असे म्हणतो. त्याचा वापर आपल्याला सिंचनासाठी करता येत नाही. काळानुसार धरणात गाळ जमा होत जातो. पण हा गाळ धरणाची साठवण क्षमता कमी करणार नाही आणि धरणाला निरुपयोगी करणार नाही यासाठी डेड स्टोरेज ठेवण्यात येते. म्हणूनच काळानुसार जीर्ण होत असलेल्या धरणांची नियमित तपासणी करणे, डागडुजी करणे आणि गाळ, वाळू काढण्यासाठी केले जाणारे काम हे खर्चिक होत जाते.
या आर्थिक कारणांमुळेच अनेकदा धरणाची व्यवस्था करणाऱ्या कामात हलगर्जीपणा केला जातो. 2010च्या एका संशोधन सर्वेक्षणात जगातील बहुतांश धरण दुर्घटना या नियमित देखभालीअभावी झाल्या असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही देशकांपासून हवामान बदलामुळे जीर्ण धरणांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. लहरी हवामानामुळे पडणाऱ्या पावसाने कोणत्या ना कोणत्या भागात पुराचा तडाखा सहन करावा लागत आहे. हवामान खात्याचे आडाखे चुकत असल्याने धरणांच्या पाण्याचे नियमन करताना देखील अडचणी येत आहेत. पावसाचे अधिकाधिक पाणी जमा करण्याच्या नादात वेळेत पाणी सोडताना व्यवस्थापनाची तारांबळ उडते आणि नंतर अचानक पडलेला मोठा पाऊस पाहता धरणे धोक्याची पातळी गाठू लागतात.
परिणामी धरण परिसरात पूर येतो. तूर्त धरणाच्या बाबतीत कितीही अडचणी असल्या तरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा मुद्दा पाण्याशी संबंधित आहे. सध्यातरी त्याला कोणताही पर्याय नाही. वास्तविक स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत पाण्याच्या बाबतीत आपण या धरणांच्या जीवावरच निश्चिंत राहिलो आहोत. या धरणांनी आपले वयोमान ओलांडले असेल तर नवीन धरणांशिवाय पर्याय नाही. ही बाब ठाऊक असूनही अकारण वेळ वाया घालवणे आणि लाखो लोकांच्या जीवांशी खेळणे धोक्याचे ठरणार आहे.