विज्ञानातील अनिश्चितता आणि त्यामुळे निर्णय घेण्यात येत असलेले अडथळे यांचा अनुभव करोनाच्या जागतिक संसर्गकाळात आपण घेतला आहे. जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये परस्परसंवाद असणे अशा वेळी आवश्यक ठरते. धोरणकर्त्यांनी अशा काळात निर्णय घेताना शास्त्रज्ञांना बळीचा बकरा करणे योग्य नसल्याचे प्रा. वेंकटरमण रामकृष्णन सांगतात. शास्त्रज्ञांनी नवीन पुराव्यांच्या आधारे जुन्या धारणा बदलण्यास तयार राहायला हवे, असेही ते म्हणतात.
सी. पी. स्नो यांनी 1959 मध्ये विज्ञान, समाजशास्त्र आणि मानवता या क्षेत्रांमधील दिग्गजांमध्ये असलेला मोठा फरक अधोरेखित केला होता. केंब्रिज विद्यापीठाचे उदाहरण देऊन त्यांनी म्हटले होते की, तेथील शास्त्रज्ञांनी मिळविलेले यशही समाजशास्त्र आणि मानवता यांच्यापासून विज्ञानाचे असलेले अंतर दूर करू शकले नाही. या संदर्भात स्नो यांनी दिलेला “दोन संस्कृती’ हा वाक्प्रचार अत्यंत चपखल आहे. गेल्या सहा दशकांमध्ये या धारणेत नक्कीच थोडाबहुत फरक पडला आहे. परंतु तरीसुद्धा हा फरक अद्याप कायम आहे. थॉमस कॅन यांनी 1962 मध्ये “द स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्होल्यूशन’ या आपल्या प्रसिद्ध रचनेत म्हटले होते की, शास्त्रीय संशोधनात व्यापक सहमतीच्या आधारावर मॉडेल तयार करण्याची गरज नेहमीच असते. बदल ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे संक्रमणावस्थेत नेहमीच नवीन आव्हाने समोर येत असतात.
कोविड-19 च्या संसर्गकाळात आपण असताना अद्याप या आजारावर लस उपलब्ध झालेली नाही. अशा काळात मूळ भारतीय वंशाचे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ प्रा. वेंकटरमण रामकृष्णन यांनी शास्त्रज्ञांच्या समुदायाला सध्याच्या आव्हानाला अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी शास्त्रीय संशोधनाची मजबूत संरचना तयार करण्याचे आवाहन केले आहे. विज्ञान ही सामूहिकरीत्या परस्पर सहकार्याने पुढे जाणारी गोष्ट असल्यामुळे या बाबतीत स्पर्धात्मक दृष्टिकोनापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या समुदायासाठी एखाद्या संकटावर तोडगा शोधून काढणे किती अवघड असते, हे आपल्याला 1981 मध्येच समजले आहे. न्यूयॉर्कमधील समलैंगिक समुदायात त्यावेळी एचआयव्हीचा प्रसार मोठ्या वेगाने झाला होता. एचआयव्ही विषाणूवरील लस अजूनही तयार होऊ शकलेली नाही. अर्थात, प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातून एचआयव्हीची दहशत काहीशी कमी करण्यात यश आले आहे. त्यामुळेच आता एड्सचा अर्थ मृत्यू असा घेतला जात नाही.
करोना हा एक नवीनच विषाणू असला तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी फार कमी काळात बरेच काही संशोधन करण्यात यश आले आहे. प्रा. रामकृष्णन यांच्या मते, हा विज्ञानाच्या क्षेत्रातील सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्याचा परिणाम आहे; परंतु या विषाणूचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत एवढ्या वेगाने कसा होत आहे आणि विशिष्ट लोकांनाच या विषाणूचा अधिक धोका का आहे, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळू शकलेली नाहीत. या आजारावरील लस निर्माण करण्याच्या आव्हानाविषयी तर प्रा. रामकृष्णन बोलतातच; शिवाय एड्सवर अजूनही लस सापडलेली नाही आणि अशाच प्रकारच्या अनेक संसर्गजन्य आजारांवर लस शोधण्यात अद्याप यश आलेले नाही याचीही ते आठवण करून देतात. करोना विषाणूवर प्रभावी औषधोपचार शोधून काढण्यासाठी सखोल संशोधनाच्या गरजेवरही ते भर देतात.
नवे पुरावे उपलब्ध झाल्यावर त्या आधारे आपल्या चुका स्वीकारण्याची आणि त्यापासून शिकण्याची प्रवृत्ती शास्त्रज्ञांमध्ये असायला हवी, असेही ते म्हणतात. कोणत्याही शास्त्रीय संशोधनाबरोबरच अनिश्चितताही जोडलेली असते आणि चुका होणे स्वाभाविक आहे, असे ते मानतात. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी एकमेकांमधील संवाद आणि विचारविनिमय अत्यंत आवश्यक आहे.
ते म्हणतात की, धोरणकर्त्यांनी आपले कठीण निर्णय घेताना शास्त्रज्ञांना बळीचा बकरा बनविणे योग्य ठरणार नाही. वस्तुतः विज्ञानातील अनिश्चितता आणि व्यावहारिक विचार यामुळे निर्णयप्रक्रिया गुंतागुंतीची होत असते. अशा स्थितीत, शास्त्रज्ञ अनेकदा चुकीचे निर्णय घेऊ शकतात. परंतु त्यावरून त्यांची क्षमता आणि निष्ठा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता कामा नये. कारण शास्त्रीय अभ्यास आणि निष्कर्ष हे त्या-त्यावेळी उपलब्ध असलेल्या तथ्यांवरच आधारित असतात.
करोना विषाणूचा प्रसार सुरू झाला, तेव्हा ब्रिटन या विषाणूचा मुकाबला करण्यास सक्षम आहे, असे मानले गेले होते. परंतु नंतरच्या घटनाक्रमातून ही धारणा चुकीची असल्याचे निष्पन्न झाले, याची आठवण प्रा. रामकृष्णन करून देतात. अशा स्थितीत भविष्यातील अन्य आव्हानांसाठी तयार राहणे अधिक महत्त्वपूर्ण आहे. सध्याच्या घटनाक्रमातून धोरणकर्ते आणि नागरिकांनी एक गोष्ट शिकायला हवी. ती म्हणजे, करोना विषाणू असो वा अन्य कोणताही संसर्गजन्य आजार असो, त्यावर उपचार शोधून काढणे अत्यंत कठीण असते.
– सुव्रत मुखर्जी