-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
शेजारच्या राष्ट्रांमध्ये असलेले पाकिस्तानी दूतावास हे भारताविरुद्ध कारवाई करण्याचे एक महत्त्वाचे स्थान आहे. या दूतावासातील कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्या गुप्तहेर कारवाया कमी करण्याची गरज आहे.
नुकतेच दिल्लीत पाकिस्तानी दूतावासाच्या दोन अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना पकडल्यानंतर भारताने त्यांची तत्काळ हकालपट्टी केली व त्यांना देश सोडून देण्याचे आदेश देण्यात आले. हे आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणेच होते. कारण परदेशी मुत्सद्दी व दूतावासाचे कर्मचारी यांना राजनैतिक संरक्षण मिळालेले असते. त्यामुळे त्यांच्यावरती फौजदारी कारवाई होऊ शकत नाही. पण त्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय कर्मचाऱ्यांना त्रास देणे सुरू केले.
पाकिस्तानची सूडबुद्धी
या वेळेस पाकिस्तानने असभ्यतेचा कळसच केला. एक अधिकारी आणि त्यांचा ड्रायव्हर भारतीय दूतावासातून विमानतळाकडे निघालेले असताना अचानक गायब झाले. लगेच भारत सरकारने दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना परराष्ट्र खात्यात बोलवून सांगण्यात आले की, जशी इथल्या पाकिस्तानी कर्मचारी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची सुरक्षेची जबाबदारी भारत सरकारची असते, तशीच पाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही तिथल्या सरकारची जबाबदारी आहे.
भारताने पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली म्हणून आम्हीसुद्धा तुमच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकू शकतो, असे पाकिस्तानला दाखवायचे होते. भारताकडून दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानने त्यांना आम्ही चौकशी करून सोडल्याचा आव आणला. यामुळे पाकिस्तानने किती पोरकट कृती केली आहे, हे जगाला कळाले. राजनीतिक पातळीवरती असे प्रसंग होत नाही आणि सगळ्या देशांना जिनिव्हा कायद्याचे पालन करावे लागते; परंतु पाकिस्तानची सूडबुद्धी इतकी तीव्र होती की पाकिस्तानने बेकायदेशीर कारवाया केल्या. बारा तासांनतर त्या दोघांची मुक्तता केली. भारताने टाकलेल्या दबावामुळे पाकिस्तानला हे करावे लागले. नाक दाबले की तोंड उघडते, असे म्हटले जाते आणि यामुळे ही सुटका झाली.
पाकिस्तानचे दूतावास भारत विरोधी कारवाया करण्याची ठिकाणे
पाकिस्तानचे नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधले दूतावास हे तिथे पाकिस्तानच्या हस्तकांना भारत विरुद्ध कारवाई करण्याकरता पैशाची मदत प्रोत्साहन आणि इतर को-ऑर्डिनेशन करण्याची ठिकाणे आहेत. येथून अनेक भारत विरोधी कारवाया केल्या जातात. पाकिस्तान अनेक दहशतवाद्यांना विमानाने नेपाळमध्ये आणून नंतर नेपाळच्या हद्दीतून भारतात घुसवतो. कारण भारत-नेपाळ सीमेवर जास्त चौकशी होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये नेपाळमधून भारतात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांची संख्या ही पाकिस्तानच्या एलओसी वरून आलेल्या दहशतवाद्यांपेक्षा जास्त आहे. हाच प्रकार श्रीलंकेच्या समुद्री सीमांकडून केला जातो. श्रीलंका आणि भारताच्या समुद्रातून अनेक पाकिस्तानी हस्तक, दहशतवादी आणि त्यांचे समर्थक दक्षिण भारतामध्ये येण्याकरता या रस्त्याचा वापर करतात. दूतावासाच्या मदतीने अफू, गांजा, चरस, खोट्या नोटा इत्यादी भारतामध्ये पाठवल्या जातात. मालदीवमधून सुद्धा अनेक भारतविरोधी कारवाया केल्या जातात, परंतु सर्वात जास्त भारतविरोधी कारवाया या अफगाणिस्तानमधील पाकिस्तानी दूतावासातून केल्या जातात.
आखाती देशांमधील पाकिस्तानचे दूतावास आयएसआय करता वेगवेगळी कामे करण्याच्या जागा आहेत. भारतीयांना पाकिस्तानच्या बाजूने काम करण्याकरता, भरती करण्याची ठिकाणे आहेत. आखाती देशांमध्ये आलेले भारतीय पर्यटक आणि इतरांवर नजर ठेवून काही जणांना त्यातून पाकिस्तानचे हस्तक बनवले जातात. म्हणून शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावासाच्या कारवाई वरती पूर्ण नजर ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
काही उदाहरणे
पाकिस्तानी राजदूत नियुक्त केलेल्या देशाचा वापर भारतात अराजकता माजविण्यासाठी करतात हे सर्वश्रुत आहे. खासकरून बनावट भारतीय चलन नोटा आणि दहशतवाद्यांना पाठविण्यासाठी यजमान देशांचा वापर केला जातो. जानेवारी 2015 मध्ये बांगलादेशातील सहाय्यक व्हिसा अधिकारी मोहम्मद मजर खान याला बांगलादेशाने बनावट चलनी नोटांच्या प्रकरणी अटक केली होती. हिज्ब-उत-तहरीर या दहशतवादी संघटनेच्या ते संपर्कात होते. पाकिस्तान उच्च आयोगातील दुसरी सचिव फारिन अर्शद हिला सुद्धा 2015 मध्ये जमात-उल-मुजाहिद्दीन (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या इद्रीस शेख यांच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले होते.
2009 ते 2016 सालादरम्यान श्रीलंकेत असणाऱ्या पाकिस्तान उच्च आयोगाचा समुपदेशक (व्हिसा) अमीर जुबैर सिद्दीकी याच्यावर अणुभट्ट्या, संरक्षण आस्थापन, चेन्नईमधील अमेरिकन दूतावास, बेंगळुरूमधील इस्रायली दूतावास आणि इतर भारतीय बंदरांवर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. नेपाळमधील पाकिस्तान दूतावासातील मोहम्मद अर्शद चिमा याला एप्रिल 2001 मध्ये काठमांडू पोलिसांनी 1 किलो आरडीएक्ससह अटक केली होती. डिसेंबर 1999 च्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 814 च्या विमान अपहरणात त्याचा हात होता.
काय करायला पाहिजे?
पाकिस्तानचा भारतातला दूतावास हे पाकिस्तानी हस्तकांना कंट्रोल करण्याचे एक ठिकाण आहे आणि अनेक गुप्तहेर ऑपरेशन्स तिथून केली जातात. अर्थातच त्यांच्यावरती भारतीय गुप्तहेर संस्थांचे लक्ष असते, ज्यामुळे त्यांना वेळोवेळी पकडले जाते. मात्र पकडल्या गेल्यानंतरचा बदला पाकिस्तानमधील भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांवरती घेतला जातो.
पाकिस्तानच्या दूतावासामध्ये पोस्टिंग झालेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना पाकिस्तान नेहमीच त्रास देत असते. त्यांच्या कुटुंबीयांचा पाठलाग करणे, त्यांच्या गाडीला धडक मारणे, त्यांच्या घरामध्ये चोरी करणे, त्यांच्या फोनवरती लक्ष ठेवणे आणि फोनवरून त्यांना धमक्या देणे अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात. याचे मुख्य कारण त्यांच्यावर मानसिक दबाव टाकून त्यांना आपले काम नीट करता येऊ नये. अनेक वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी करून सुद्धा पाकिस्तानची ही कृती थांबलेली नाही. म्हणून भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा हा नेहमीच आव्हानाचा विषय राहिलेला आहे.