संगमनेर -आमचे संपूर्ण आयुष्य कॉंग्रेसमध्ये राहिले आहे. कॉंग्रेस पक्षाबाबत लोकांमध्ये गैरसमज करू नये परंतु याबाबत योग्य वेळ आल्यावर आपण नक्कीच सविस्तर बोलू. आपल्या कुटुंबाचे शंभर वर्षांपासून कॉंग्रेसबरोबर योगदान आहेत. कॉंग्रेसने नाही तर काही व्यक्तींनी तसे आरोप केले असून योग्य वेळ आल्यावर त्याबद्दल बोलेल, अशा शब्दांत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सूचक इशारा दिला.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आपण मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जे अर्धसत्य सांगत आहेत ते चुकीचे आहे. मी कॉंग्रेसचाच फॉर्म भरलाय, हे सत्य तुम्ही लोकांना का सांगत नाही ? असा सवाल केला. हे पूर्ण सत्य सांगितल्यानंतर लोक चकित होतील. योग्यवेळ आल्यावर पूर्ण सत्य सांगणार आहे. विखे पाटलांनी पाठिंबा दिला आहे, याबाबत प्रश्न केला असता ऑलरेडी माझा विजय झाला असल्याचे सांगितले.
आ. बाळासाहेब थोरात कुटुंब प्रमुख
आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी काही बोलणे झाले आहे का? याबाबत बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, ते आजारी आहे. त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची सहा आठवड्यांची विश्रांती सांगितली आहे. अशा परिस्थितीत त्यांना त्रास देण्याची गरज नाही, ते आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्या आजारपणाचा फायदा पक्षांतर्गत विरोधकांनी घेतला का? याबाबत योग्य वेळ आल्यावर बोलेल, असे तांबे म्हणाले.