संगमनेर -देशासह राज्यात वाढत चाललेल्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अत्यंत प्रभावीपणे काम करत असून, याचबरोबर खरीप हंगामाच्या पिकांचे नियोजन, बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदी बाबींच्या पूर्वतयारीची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री थोरात यांनी घेतलेल्या या बैठकीस प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, आ. थोरात यांचे विशेष कार्य अधिकारी सुभाष काटकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण अरगडे आदी सहभागी झाले होते.
या बैठकीदरम्यान ना. थोरात यांनी कृषी विभागाला बियाणे, रासायनिक खतांचे व औषधांचे नियोजन कृषी विभागाने करावे. तालुक्यात कुठेही तुटवडा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच खरीप पिकात गेल्या दोन-तीन वर्षांपासूनची मागणी लक्षात घेवून, ज्या वाणांस प्रतिसाद चांगला मिळतो, त्या वाणांच्या बियाण्याची उपलब्धता मुबलक होईल, असे नियोजन करावे.
तक्रार निवारणासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षाची तत्काळ स्थापना करावी. भरारी पथकाची नियुक्ती करावी. पीकविमा भरपाईमध्ये पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व काय आहे, त्याबाबत गावपातळी पर्यंत जाणीव जागृती करणे याबाबत मार्गदर्शन केले. तालुक्यातील शेतकरी उत्पादक गटांमार्फत लॉकडाऊनच्या काळात मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरी भागातील ग्राहकांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या मूल्य साखळीचे सबलीकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याकरीता गटास अनुदानित पॅक हाऊस उभारणी, शीतवाहन उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये व गावातच काम उपलब्ध होईल, अशा सूचना प्रशासनास यावेळी केल्या.