मेलबर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-ट्वेन्टी वर्ल्डकपबाबतचा अंतिम निर्णय पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलला तरी यजमान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (सीए) कोरोनापुढे हात टेकले आहेत. यंदा (२०२०) विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे जवळपास अशक्य असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी म्हटले आहे.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपबाबत आयसीसी कार्यकारिणी समितीच्या अंतिम निर्णयापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल आयोजनाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्य क्रिकेट असोसिएशन्सना पत्र लिहून आयपीएल आयोजनासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी न झाल्यास बीसीसीआयने परदेशात आयपीएल खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी यूएई म्हणजे संयुक्त अरब अमिरातीला प्राधान्य दिले आहे.
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणा-या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन यंदाच्या वर्षात करणे हे सध्या तरी शक्य नाही. विश्वचषक स्पर्धा अद्याप रद्द करण्यात आलेली नाही किंवा पुढेदेखील ढकलण्यात आलेली नाही. पण विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणा-या १६ संघांपैकी अनेक देश कोरोना रोगाच्या तडाख्यातून अद्यापही सावरू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत सर्वच्या सर्व देशांच्या संघांना एकत्र आणून खेळवणे हे खूपच कठीण आहे. आयसीसीची जुलै महिन्यात होणारी बैठक ठरल्याप्रमाणे होणार आहे. त्या बैठकीत अनेक गोष्टींमध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष एडिंग्ज यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. ऑक्टोबर महिन्यात टी-ट्वेन्टी वर्ल्डकप होणार असल्याने इतक्या कमी कालावधीत टी-ट्वेन्टी विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करण्याबद्दल बोर्डाच्या पदाधिका-यांमध्ये संभ्रम होता. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने प्रत्येक घटकाच्या सुरक्षेचा विचार करून नवीन पर्याय शोधण्यावर आयसीसीच्या मागील बैठकीत एकमत झाले होते. त्यामुळे आयपीएल आयोजनाबाबत अंतिम निर्णयासाठी आयसीसीने जुलै महिन्याची डेडलाइन दिली होती. वर्ल्डकप आयोजनामधील अनेक अडचणी पाहता ऑस्ट्रेलिया बोर्डाने मायदेशात होणाºया भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. भारताचा संघ ऑस्ट्रेलियात ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा हा दौरा रद्द झाला तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुमारे २,४०० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे.