केरळ – आपल्या राज्यातील एका व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य एकत्र आल्याचे चित्र दुर्मिळच. पण केरळसारख्या राज्याने मानवतेचे एक मोठे उदाहरण प्रस्थापित केले आहे. केरळच्या कोझिकोडमधील रहिवासी असलेल्या रहिमची मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्यासाठी जगभरातील केरळी लोक एकत्र आले आणि त्यांनी तब्बल ३४ कोटींची रक्कम लोकवर्गणीद्वारे जमा केली. (As many as 34 crores were collected by people irrespective of caste and religion; Residents of ‘Kerala’ rushed to save ‘Rahim’)
पोटापाण्याची सोय म्हणून नोकरीसाठी सौदी अरेबियात गेलेला तरुण एका चुकीमुळे तिथेच फसला. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. आयुष्याने त्याला वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवले. पण केरळवासीयांनी त्याच्या सुटकेसाठी जात, धर्म, पंत, भेद असं सर्वकाही विसरून प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला मदत म्हणून उद्योगपतींपासून ते कामगारांपर्यंतच्या लोकांनी मदत केली आहे.
सध्या सौदी अरेबियात अडकलेल्या या तरुणाचे नाव अब्दुल रहीम आहे. ते मुळचा केरळमधील कोडामपुझा येथील रहिवासी असून ऑटोरिक्षा चालवायचे. नोव्हेंबर 2006 मध्ये ते सौदी अरेबियात गेले होते. तेथे ते अब्दुल्ला अब्दुरहमान अल शाहिरी नावाच्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करू लागले. या व्यक्तीचा आनस अल शाहिरी नावाचा एक दिव्यांग मुलगा होता. या मुलाच्या देखभलाचीही जबाबदारी रहीम यांच्यावरच सोपवण्यात आली होती.
रहीम यांना सौदी अरेबियात जाऊन एक महिनाही झाला नव्हता. सौदीमध्ये जाताना त्यांनी उराशी अनेक स्वप्न बाळगली होती. मात्र या महिन्याभरातच त्यांच्याकडून नकळतपणे एक चूक झाली. दिव्यांग मुलाच्या गळ्यावर श्वास घेण्यासाठी एक पाईप लावण्यात आला होता. याच पाईपला रहीम यांचा हात लागला आणि तो निघून पडला. या दुर्गघनेनंतर तो दिव्यांग मुलगा बेशुद्ध पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
पुढे रहीम यांच्यावर खटला भरण्यात आला आणि खुनाच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं. रहीम यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. वरच्या न्यायालयानेदेखील ही शिक्षा कायम ठेवली. रहीम यांची शिक्षा माफ व्हावी यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले. मात्र त्याची शिक्षा माफ करण्यात आली नाही. शेवटी तोडगा म्हणून रहीम यांच्या सुटकेसाठी 16 एप्रिलपर्यंत तब्बल 15 दशलक्ष सौदी रियाल (34 कोटी) देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, आता रहीम लवकरच घरी येणार आहेत. त्यांची संपूर्ण केरळ आतुरतेने वाट पाहतोय. रहीम यांच्या कुटुंबीयांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने रहीमच्या सुटकेसाठी तब्बल 34 कोटी उभे करणाऱ्या केरळवासीयांचेही सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.