पुणे – ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक आणि माजी आमदार ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांचे साहित्य आणि काव्य हे वास्तवदर्शी, हृदयाला भिडणारे होते. त्यांची अनेक गीते लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा एक थोर कवी आणि साहित्यिक गमावला आहे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
जवळचा मित्र गेल्याचं दु:ख
माझे जवळचा मित्र आणि महाराष्ट्राचा “रानकवी’ ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. ना. धों. चे बालपण कष्टात गेले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. त्यांच्या कविता, रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैतसारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. “ना.धों’ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खुपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडलाच. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावे हा योग मनाला चटका लावून जाणारा आहे. – शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष
संवेदनशील कवी हरपला
मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे. “मराठी माती’ ही सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
साहित्याला मातीचा गंध देणारा “कवी’
मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणले. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते “वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते. राज्य सरकारच्या “कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या “पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केले. – अजित पवार, उपमुख्यमंत्री
राना-वनातील निसर्गकवी हरपला
निसर्गकवी, गीतकार, पद्मश्री ना. धों. महानोर यांचे निधन ही मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. मराठी साहित्यविश्व आपल्या कवितांनी समृद्ध आणि निसर्गरम्य करणारे थोर कवी ना. धों. महानोर यांच्या जाण्याने राना-वनातील निसर्गकवी हरपला. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रातील ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
“मसाप’चा आधारवड गेला
गदिमा, जगदीश खेबुडकर आणि शांता शेळके यांच्याप्रमाणेच दर्जेदार गीत लेखनाची परंपरा महानोरांनी समृद्ध केली. त्यांचे पुण्यावर आणि विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषदेवर विशेष प्रेम होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न लढवण्यावर ते ठाम होते. संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक देण्यासाठी महामंडळाने घटना बदलली. अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावे यासाठी त्यांना फोन केला होता. प्रकृती अस्वास्थ्याचे कारणाने नम्रपणे नकार दिला. – प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप
कवी काळाच्या पडद्याआड
मराठवाड्याच्या बोली भाषेतील अनेक शब्द ही महानोर यांनी मराठी साहित्याला दिलेली अनमोल देणगी आहे. स्वतंत्र शैली असलेला कवी, गीतकार आपल्यातून निघून गेला आहे. जामखेड येथील कविसंमेलनात संत नामदेव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. लहान लहान खेड्यातील कवींनी बोलावल्यावर ते आवर्जून जात असत. – रामदास फुटाणे, वात्रटिकाकार
महानोर यांचे काम खुप मोठे होते
जोपर्यंत त्यांची कविता जिवंत आहे तोपर्यंत ते अमर आहेत. उत्तम कवी मनाचा माणूस म्हणून ते अवघ्या महाराष्ट्राला माहीत होते. निसर्गाशी अतूट नाते सांगणारे ते कवी होते. “जैत रे जैत’ चित्रपटातील सगळी गीते त्यांनी लिहिली. त्यांच्या गीते मनाला भिडली. तेव्हापासून त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला, मैत्रीचे नाते निर्माण झाले. – डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते
महानोर हे महान कवी होते
माझे जवळचे मित्र होते. मी दिग्दर्शित केलेल्या “जैत रे जैत’, “एक होता विदूषक’ आणि “मुक्ता’ चित्रपटांमधील गीते त्यांनी लिहिली.ती गीते अजरामर आहेत. महानोर यांच्या आठवणी मनात कायम राहतील. माझी आणि महानोरांची मैत्री “जैत रे जैत’ चित्रपटापासूनची होती. हा संगीतमय चित्रपट होता. चित्रपटाची निर्मिती मंगशेकर कुटुंबीयांकडून करण्यात आली. या चित्रपटातील गीते कोण लिहिणार, हा प्रश्न आला आणि महानोरांचे नाव पुढे आले. त्यांनी चित्रपटातील गीते रचली. 50 वर्षे झाली तरी या चित्रपटातील गीते लोकप्रिय आहेत. – डॉ. जब्बार पटेल, चित्रपट दिग्दर्शक